मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीवरून राज्यात चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकाच मंचावर हजेरी लावली होती. त्यामुळे दोन पक्षात युतीहोणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. पण आता या युतीवर खुद्द प्रश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीच्या चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. याविषयी बोलताना, “आमचं नातं अजून जमलेलं नाही. आम्ही फक्त एकमेकांवर लाईन मारतोय,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आंबेडकरांनी ही टिपण्णी करताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. प्रकाश आंबेडकर नाशिक दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. देशाच्या पंतप्रधानांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी व्हायला हवे. परंतु, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही प्रचाराला येत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा करण्याला आक्षेप घेत पंतप्रधान पदाची पातळी आता ग्रामपंचायतीपर्यंत आल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच देशात सध्या हुकुमशाही, दंडेलशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने (ठाकरे गट) आमचा पाठिंबा मागितलेला नाही. शिवसेनेसोबत अद्याप आमचे नाते जमलेले नाही. आम्ही सध्या केवळ एकमेकांना खाणाखुणा करीत आहोत, अशा विनोदी शैलीत त्यांनी उत्तर दिले.