हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : भारताचे चांद्रयान-३ चंद्रावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर भारतीय शास्ज्ञज्ञांचे जगभरात कौतुक होत आहे. चांद्रयान मोहिमेमध्ये तब्बल १६ हजार ५०० शास्त्रज्ञांनी आपले योगदान दिले आहे. या सर्व शास्त्रज्ञांच्या पथकामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील महेश काळपांडे या तरुण शास्त्रज्ञाचाही समावेश होता.
चांद्रयानाचे लँडिंग यशस्वी होताच महेश काळपांडे यांच्या वडिलांनी फोन करून त्याचे अभिनंदन केले. तेव्हा ‘बाबा, भारताने इतिहास घडविला’ हे वाक्य बोलताना महेशला आनंदाचे भरते आले. तर, त्याचे वडिल डॉ. दिलीप काळपांडे याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील डॉ. दिलीप.काळपांडे व शिक्षीका मालाताई काळपांडे यांचा मुलगा महेश काळपांडे याचे प्राथमिक शिक्षण कुरुंदा येथीलच प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर त्याने लातुर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे पुणे येथे एमटेक केल्यानंतर त्याने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली.
महेशला लहानपणापासून खगोलीय घटनांची आवड होती. शिवाय चंद्र, तारे, ग्रह या विश्वातच तो रमून जात होता. त्यामुळे त्याला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ व्हायचे होते. त्यासाठी त्याने दिवस रात्र एक करून अभ्यास केला. दोन वर्षापुर्वीच त्याची इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. त्याला सुरूवातीला अंटार्टिका येथे प्रशिक्षण दिले. त्यानंतर बंगळुरू येथे नियुक्ती मिळाली.
चांद्रयान मोहिमेतही महेशचा सहभाग होता. भारताने जुलै महिन्यात चंद्रायान मोहिम सुरु केल्यानंतर संपूर्ण जगाचे या मोहिमेकडे लक्ष लागले होते. हिंगोली जिल्ह्याचा भुमीपुत्र महेश काळपांडे यामध्ये सहभागी असल्यामुळे हिंगोलीकरांचे या मोहिमेवर विशेष लक्ष होते.
हिंगोलीत बुधवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजल्यापासूनच चांद्रयान लँडिंगचा क्षण डोळ्यास साठविण्यासाठी सारेजण सज्ज होते. ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान लँडिंग झाल्यानंतर सर्व जिल्ह्यात जल्लोष झाला. त्यानंतर काळपांडे कुटुंबियांवरही
अभिनंदनाचा वर्षाव झाला. याच वेळी डॉ. काळपांडे यांनी महेश यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. त्याने “बाबा, आम्ही यशस्वी झालो, भारताने इतिहास घडविला” असे सांगताना त्याला आनंदाचे भरते आले. तर त्याचे वडिल डॉ. काळपांडे, आई मालाताई काळपांडे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले होते.