अकोले – अकोले तालुक्यातील शिक्षकांचे काम चांगले असून, त्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
अकोले येथे जिल्हा बॅंकेच्या कार्यालयात आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे, रमेश देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, बाळासाहेब मुखेकर, गोरख लोहरे, गणपत सहाणे, बबन निघुते, सतीश जाधव, प्रतीक नेटके, गोरक्ष देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, सोमनाथ उघडे, राहुल गोडे, रोहिदास जाधव, अर्जुन तळपाडे, रूपेश वाकचौरे, अमोल सुकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार पिचड म्हणाले, शिक्षकांचे प्रश्न सुटले, तर त्यांना विद्यार्थी चांगले घडवता येतील. आगामी काळात शालाबाह्य कामे कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांसाठी वेळ देता आला पाहिजे. त्याच प्रमाणे कमी पटाच्या शाळा बंद होऊ नये यासाठी माझा सतत पाठपुरावा चालू आहे. जालिंदर वाकचौरे म्हणाले, आदिवासींसाठी पेसा कायदा खऱ्या अर्थाने माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यामुळे झाला. त्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांनी शिक्षकांना शाळाबाह्य कामांमुळे विद्यार्थ्यांसाठी म्हणावा तसा वेळ देता येत नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लालू वायळ आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक राम वाकचौरे यांचाही सत्कार करण्यात आला.