शहरात सांडपाणी संकलनासाठी 150 कि.मी. लांबीच्या गटारीचे काम करण्यात येणार
नगर – केंद्र व राज्य शासनाने देशातील नद्यांच्या शुद्धीकरणासाठी मोहीमच हाती घेतली. यात नमामी गंगे, नमामी चंद्रभागे’ आदी मोहिमाही राबविण्यात आल्या. त्याच धर्तीवर सीना नदीही स्वच्छ करण्यासाठी गेल्या वर्षी राज्य शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्पाचे काम वर्षभरापासून वेगात सुरू झाले आहे. हा प्रकल्प एक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असून सीना आता स्वच्छ होणार आहे.
सीना नदीही स्वच्छ करण्यासाठी गेल्या वर्षी राज्य शासनाने या प्रकल्पाला अमृत योजनेतून निधी मंजूर केला. या निधीतून शहरातील रेन वॉटर हार्वेस्टिंगव्यतिरिक्त सर्व सांडपाणी भुयारी गटाराने वाकोडी येथील महापालिकेच्या जागेत नेणे व वाकोडी येथे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ झालेले पाणी शेतीला अथवा नदीत सोडण्यात येणार आहे. या कामासाठी 18 सप्टेंबर 2017 ला तांत्रिक मान्यता, तर 25 सप्टेंबर 2017 ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. 124 कोटी 38 लाख रुपयांचे हे काम असून, ते नंदुरबारच्या ड्रीम कन्स्ट्रक्शनकडे देण्यात आले आहे.
भुयारी गटार प्रकल्पासाठी 150 ते 1 हजार 200 एमएमचे पाइप वापरण्यात आले आहेत. शहरातील जुना भाग, मार्केट यार्ड, सारसनगर ते फराहबक्ष महाल परिसर आदी ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे भुयारी गटारासाठीचे 150 एमएम व्यासाचे पाइपही कमी पडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. शहरातील सर्व सांडपाणी संकलनासाठी 150 किलोमीटर लांबीची भुयारी गटारे तयार करण्यात येत आहेत. यातील 15 किलोमीटर लांबीची भुयारी गटारे तयार झालेली आहेत. यात सीनाच्या मुख्य लाइनचाही समावेश आहे.
वाकोडी येथील महापालिकेच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प उभा राहत आहे. हा प्रकल्प 57 मिलियन ऑफ लिटर पर डे क्षमतेचा (एमएलडी) असून, तो पाच एकरांत आहे. यात सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन स्वच्छ पाणी तयार करण्यात येणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. नगर तालुक्यातील अनेक गावांना सीना नदीमुळे प्रदूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात बाळासाहेब हराळ यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाद मागितल्याने 2013 मध्ये विभागीय आयुक्तांनी महापालिकेला मलनिस्सारण प्रकल्प राबविण्याचे निर्देश दिले होते.
या प्रकल्पामुळे सीना नदी स्वच्छ होणार आहे. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच आजपर्यंत 40 टक्के काम झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांनाही पाणी वापरायला मिळणार आहे. उर्वरित पाणी सीना नदीत सोडण्यात येईल.
महादेव काकडे प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका