जामखेड – मागील 50 वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचा रखडलेला विकासकामांचा अनुशेष मंत्रिपदाच्या माध्यमातून भरून काढला. त्यासाठी प्रशासनाची साथ महत्त्वाची ठरली. प्रशासनाच्या सर्व विभागांची ही साथ अशीच कायम राहिल, हा विश्वासच मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
तालुक्यातील चौंडी येथील माणकोजी शिंदे सभागृहात कर्जत-जामखेड तालुक्यांतील विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ना. शिंदे बोलत होते. प्रातांधिकारी अर्चना नष्टे, जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, कर्जतचे तहसीलदार वाघ, जामखेडचे पोलीस निरीक्षक, कर्जतचे पोलीस निरीक्षक, जामखेडचे तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, कर्जतचे कृषी अधिकारी दीपक सुपेकर, बीडीओ अशोक शेळके, बीडीओ मुकंद पाटील, मुख्याधिकारी सुहास जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कांबळे, ए. बी. भोसले, उपकोषाधिकारी प्रमोद काकडे, भूमिअभिलेख उपअधीक्षक धीवर, तालुका आरोग्याधिकारी सुनील बोराडे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी हिरा सानप, सहायक निबंधक देविदास घोडेचोर, निबंधक अंजली वाघमारे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता पानसरे, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ना. शिंदे म्हणाले, मंत्रिपदाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत जी कामे केली, त्या कामांचा लेखाजोखा ऍपद्वारे एका क्लिकवर सर्वांना पाहता येत आहे. ही सर्व विकासकामे प्रशासनाच्या सहकार्यातूनच होऊ शकली. प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानने माझे कर्तव्य आहे. त्यासाठीच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रांताधिकारी नष्टे यांनी मनोगत व्यक्त केले.