Eknath Shinde – ओबीसी समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘डीप क्लीनिंग ड्राइव्ह’ मोहिमेत घाटकोपरमध्ये सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे (manoj jarange patil) यांच्या होणाऱ्या बैठकीपूर्वी मराठा आरक्षणाबाबत हे वक्तव्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी सर्व मुंबईकरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
यावर बोलतांना शिंदे म्हणाले की, सरकारचे धोरण आणि भूमिकाही स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही इतर किंवा ओबीसी समाजाचा आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी काल झालेल्या ठाकरे गटाच्या धारावी बचाव मोहीम या मोर्चावर टीका केली. कालचा मोर्चा हा विकास विरोधी मोर्चा होता. धारावी आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी लोक कसे राहतात? कोणत्या परिस्थितीत राहतात? त्यांचे जीवन उंचावले पाहिजे, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका सरकारची आहे.
यापूर्वी सॅकेलिंग नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता. त्याचे कॉन्ट्रॅक्ट का रद्द केले? जर का यांना अदानीला विरोध होता. तर यांनी सॅकेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट का रद्द केले, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्या कॉन्ट्रॅक्टर सोबतच्या काही तडजोडी असतील त्या तुटल्या असतील, ज्यामुळे हे सगळे घडत आहे, असेही विधान त्यांनी केले आहे.
सरकार धारावीकरांच्या पाठिशी- शिंदे
सरकार संपूर्ण धारावीकरांच्या पाठिशी उभे असून आमचे सरकार धारावीकरांना न्याय देणार असे शिंदे म्हणाले. तर ते पूर्णपणे विकासाच्या विरोधी आहेत. यांनी प्रत्येक वेळी आरे कारशेड, समृद्धी महामार्गाचे काम, मेट्रोचे काम आणि विकासाचे प्रकल्प थांबविण्याचे काम केले आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे. पण आमचे सरकार धारावीकरांना न्याय देणारे आहे. यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचा फायदा होणार नाही.