मुंबई : राज्यावर आलेल्या अस्मानी संकटांचे सध्या राजकारण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी केलेल्या वक्तव्यावरून आता सत्ताधारी मंत्री संतापले असल्याचे दिसत आहे.
नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने एकेरी भाषेत बोलत आहेत, त्याला जशास तसे उत्तर देण्याची आणि त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे. मात्र, आम्ही सय्यमी आहोत आणि आम्हाला संयम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहे.
“नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पद हे एक घटनात्मक पद आहे. त्या व्यक्तीबद्दल एकेरी भाषेत बोलणे, हे राणेंसारख्या व्यक्तींना शोभत नाही. आम्ही संयमी आहोत आणि आम्हाला सय्यम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. नाही तर त्यांना तशाच भाषेत उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची हिंमत आम्हा शिवसैनिकांत आहे.
मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत, की या आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या मदतीकडे लक्ष द्या, त्यांना अडचणीतून बाहेर काढा. म्हणूनच आम्ही शांत आहोत. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत राणे जे एकेरी भाषेत बोलले, त्याला जशास तसे उत्तर देण्याची आमची ताकद आहे. पक्ष प्रमुखांनी आम्हाला शांत रहायला सांगितले आहे म्हणूनच आम्ही शांत आहोत,” असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री राणे यांना दिला आहे.