“नावात काय आहे,’ असं शेक्सपीअरनेच काय… कुणीही म्हटलं असतं तरी नावात नेमकं काय असतं हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना काही दिवसांपूर्वीच कळून चुकलंय. विशेषतः एकमेकांच्या अडनावांवरून टिप्पणी करणाऱ्या नेत्यांना तर नाममाहात्म्य चांगलंच पटलं असेल..! नावाविषयी आणि त्याहूनही अधिक अडनावाविषयी प्रत्येकजण आत्यंतिक संवेदनशील पाहायला मिळतो. कारण अडनावाला चिकटूनच जात येते.
खरं तर जातिव्यवस्थेचा इतिहास जसजसा जुना होईल, तसतसं या गोष्टीकडे दुर्लक्ष व्हायला हरकत नव्हती. पण जगानं कितीही प्रगती केली, तरी या बाबतीत गाडी उलट्याच दिशेनं चाललीये. कुणी ऍफिडेव्हिट करून कोर्टातून आपलं नावडतं नाव किंवा अडनाव बदलून घेतो, कुणी अडनावापुढं “पाटील’ किंवा “देशमुख’सारखे भरभक्कम शब्द जोडतो तर कुणी आपलं अडनाव आणि त्यायोगे जात कळू नये म्हणून नाव बदलून घेतो. परंतु सरकारी यंत्रणेतल्या कारभाऱ्यांनी गफलत केल्यामुळे ज्याचं नाव आपोआपच बदललं, त्याने काय करायचं..? हे सक्तीचं नामांतर कसं स्वीकारायचं? त्यातसुद्धा जर अडनाव चमत्कारिक असेल तर आपल्याच तोंडून आपलं नाव सांगायचं कसं?
अशाच सक्तीच्या नामांतराचं मजेशीर उदाहरण पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात आढळून आलं. सरकारी कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचं अडनाव बदलताना जेवढी “कलात्मकता’ दाखवली नसेल, तेवढी त्या व्यक्तीनं आंदोलन करण्यात दाखवली. या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकदा सांगूनसुद्धा दुर्लक्ष करणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
या पठ्ठ्यानं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची जीप अडवली आणि जीपच्या खिडकीपाशी जाऊन तो कुत्र्यासारखं भुंकू लागला. त्याच्या हातात काही कागद होते. भुंकता-भुंकता त्यानं एकेक कागद या अधिकाऱ्याच्या ताब्यात दिला. व्हिडिओ रेकॉर्डिंग होतंय म्हटल्यावर अधिकारीही संकोचला. त्यानं त्या माणसाचं भुंकणं थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो भुंकतच राहिला. सरकारी यंत्रणेकडून झालेली चूक किती विचित्र आणि गंभीर आहे, त्यामुळे संबंधिताला कोणत्या त्रासातून जावं लागत असेल, याचं भान अधिकाऱ्याला येईपर्यंत तो भुंकत राहिला. या बाबूमोशायचं अडनाव आहे “दत्ता’; परंतु त्याच्या रेशन कार्डवर नोंदवलं गेलंय “कुत्ता’!
सरकारचा प्रसाद म्हणून हे असलं अडनाव कोण स्वीकारेल? प्रामाणिकपणा आणि इमानीपणासाठी जरी या प्राण्याचा दाखला वारंवार दिला जात असला, तरी या प्राण्याच्या नावानं हाक मारणं कुठल्याच माणसाला कधी आवडलेलं नाही. भले लोकांनी आपल्याला प्रामाणिक म्हटलं नाही तरी चालेल; पण “कुत्ता’ म्हणता कामा नये, असंच कुणालाही वाटेल! बॉलिवूडनेसुद्धा या प्राण्याची प्रतिष्ठा वाढवणारे “तेरी मेहरबानिया,ं’ “एन्टरटेन्मेन्ट’ वगैरे चित्रपट काढले असले तरी “बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना’ वगैरे डायलॉगमधून याच बॉलिवूडनं याच प्राण्याची कित्येकदा अप्रतिष्ठाही केलीये.
खरं तर दत्ता यांनी रेशन कार्डातली चूक जेव्हा पहिल्यांदा निदर्शनास आणून दिली, तेव्हाच चुकीची दुरुस्ती व्हायला हवी होती. परंतु अनेक हेलपाटे घालूनसुद्धा दत्ता यांच्या पदरात काहीच पडलं नाही. कदाचित सरकारी कार्यालयातले कारकून स्वतःच केलेल्या या गंभीर विनोदावर खूश झाले असावेत. परंतु अधिकाऱ्याच्या गाडीसमोर जाऊन दत्ता यांनी भुंकायला सुरुवात केली, तेव्हा सगळेच घाबरले. आता त्यांनी अधिकाऱ्यांना चावायला सुरुवात करण्यापूर्वी दुरुस्ती होईल, ही अपेक्षा!