स्त्री-मुक्ती चळवळीचा रोख पुरुषांविरुद्ध नाही
जवाहरनगर, दि. 20 – भारतातील स्त्री-मुक्ती चळवळीचा रोख पुरुषांविरुद्ध नाही, असे आज पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्पष्ट केले. येथे ईशान्य विभागातील महिलांच्या परिषदेत त्या भाषण करीत होत्या.
कॉंग्रेसचा महिला विभाग यू. एन. ढेबर हे अध्यक्ष असतानाच स्थापन झाला आहे, याची आठवण करून देऊन त्या म्हणाल्या, “मी स्वतः या महिला विभागाची पहिली निमंत्रक होते.’ भारतात पंतप्रधानपदी, कॉंग्रेसच्या 2 सरचिटणीसपदी व राज्याच्या मुख्यमंत्रिपदी महिला असूनही स्त्री-मुक्तीच्या बाबतीत म्हणावी तशी प्रगती झालेली नाही, याबद्दल पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खेद व्यक्त केला. येणाऱ्या काळात स्त्रीमुक्ती चळवळ वेग घेईल.
अणुशक्तीचा वापर शांततेसाठीच व्हावा
मुंबई – अणुशक्तीचा वापर केवळ शांततेच्या कामासाठी व मानवजातीच्या भल्यासाठीच झाला पाहिजे, असे बल्गेरियाचे अध्यक्ष मि. ट्रोडोर झिव्हकोव्ह येथे म्हणाले. टॉम्बे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रास भेट दिल्यानंतर आकाशवाणीसाठी मुलाखत दिली. शांततेसाठी व मानवजातीच्या भल्यासाठी भारत अणुशक्तीचा उपयोग करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भारत-इजिप्त वाढती मैत्री
कैरो – इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत व भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत-इजिप्तचे संबंध वाढत असल्याबद्दल इजिप्तमधील ज्येष्ठ नेते डॉ. खलिल मुस्ताफा यांनी गौरव केला आहे.