सातारा – मायणी आणि कुकुडवाडसह 32 गावांना पाणी देण्यात आम्ही यशस्वी होतोय, आता वंचित रहाणाऱ्या गारुडी आणि परिसरातील गावांनाही पाणी देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यासाठी माझे प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपची विचारधारा स्वीकारलेल्या सरपंच आणि कार्यकर्त्यांना पक्षाचे पाठबळ देण्यात कुठेच कमी पडणार नाही, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार यांनी दिली.
खटाव तालुक्यातील गारुडी येथील सभामंडप, साकव आणि तरसवाडी रस्ता अशा दोन कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले सरपंच प्रतिनिधी नागेशशेठ सरगर, मंगल सरगर, जीवन पुकळे, रामभाऊ पवार, आनंदा घाडगे, विजय जंगम, रघू जाधव, बाबूराव निकम, दादा पुकळे, काकासाहेब घुटुगडे, दगडू घुटुगडे, मारुती मोटे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. जयकुमार गोरे म्हणाले, “”देशात आणि राज्यात आपलेच सरकार असल्याने गावोगावची विकासकामे वेगाने करत आहे.
मोठमोठे रस्ते, पिण्याच्या योजना मार्गी लावण्यासाठी कोट्यवधींचा निधी आपण मिळवत आहोत. देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विविध योजनांचा लाभार्थी आहे. गावच्या विकासासाठी राजकारणापलिकडील भूमिका घेऊन मी काम करतो. मात्र, प्रत्येक बाबतीत आम्ही गांधींची भूमिका स्वीकारणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्यांचा हिशोब आम्ही नक्कीच करणार आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत ठरलयवाले ठरवून एकत्र आले होते.
मात्र, जनतेच्या पाठबळावर त्या सर्वांना चारी मुंड्या चीत केले. या भागातील तरसवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल.'” पाच तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे कामही लवकरच मार्गी लावणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले. गोरे यांच्या नेतृत्वाखाली गारुडीच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे नागेशशेठ सरगर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना थारा देऊ नका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आमदार देतील तो उमेदवार निवडून आणू, असे सचिन चव्हाण यांनी सांगितले.