पुणे – खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत अडीच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेने जुलै अखेरपर्यंत धरणसाखळीतून दोन टीएमसी कमी पाणी वापर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या होत्या. त्याच नियोजनाचा एक भाग म्हणून शहरात आता गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जाण्याची शक्यता आहे.
शहरात प्रत्येक गुरूवारी पाणी बंद ठेवल्यास महापालिकेस महिन्याला ०.२५ टीएमसी पाणी वाचविता येणार आहे. तर जुलै अखेरपर्यंत ही बचत सुमारे १.७५ टीएमसी होणार आहे. परिणामी, इतर सर्व दिवशी केल्या जाणार्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात करावी लागणार नाही. तसेच जलकेंद्राची देखभाल दुरूस्ती, पाण्याचे नियोजन तसेच गळती शोधण्यासाठीही प्रशासनाला एक दिवस मिळणार आहे.
त्यामुळे एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. या पाणी बचतीसाठीचा मनपा प्रशासनाला आराखडा करावा लागणार आहे. त्यामुळे सर्व बाबींची तपासणी करण्यात येत आहे. एक दिवस पाणी बंद ठेवणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. मात्र, याबाबतचा निर्णय आयुक्तांकडूनच घेतला जाणार आहे.
राजकीय दबावाचे आव्हान
रब्बी हंगामासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. उन्हाळ्यातही एक आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पाणीकपात करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. महापालिकेनेही त्याला प्रतिसाद दिला असला, तरी आगामी लोकसभा निवडणुका पाहता यानिर्णयासाठी प्रशासनाला राजकीय दबावाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.