फुरसुंगी – फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोबाधित भागातील जलस्त्रोत गेल्या 12 वर्षांत पूर्णत: दूषित झाले आहेत. विहिरी, कुपनलिका असे हक्काचे स्त्रोत दूषित असताना पालिका समावेशानंतरही महापालिका या गावांना पाणी पुरवठा करण्यास हात झटकत आहे. पालिकेत गाव समावेशानंतर पाणीप्रश्न सुटेल, अशी अपेक्षा असताना ती फोल ठरली आहे. ऐन उन्हाळ्यात अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत असून टॅंकर आल्यानंतर हंडाभर पाण्यासाठी पळापळ करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लोकसंख्येचे तुलनेत टॅंकरच्या फेऱ्याही कमी होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून वाढीव टॅंकर देण्याची मागणी करण्यात आली आहे.
उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोत पुणे महापालिकेने जून 2010 पासून ओपन डंपिंग बंद करून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पोकळ व फसवे ठरले आहे. या परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलने केली. मात्र, आश्वासनाशिवाय काहीच होत नसल्याचे उघड होत आहे.
कचरा डेपो परिसरात राहणारे नागरिक दुर्गंधी, डास, माशा, रोगराई, आरोग्यास घातक दृषित दुर्गंधीयुक्त काळेपाणी यामुळे त्रस्त झाले आहेत. पालिकेकडून केली जाणारी विकासकामेही कचरा डेपोबाधित परिसराऐवजी इतर भागात करण्यात आली. त्यामुळे हा परिसर कायमच दुर्लक्षित राहिला आहे. कचरा डेपोजवळील घुलेवस्ती, गणेशनगर, उत्तमनगर, पॉवरहाऊस, रेल्वेस्टेशन भागातील नैसर्गिक जलस्त्रोत गेल्या 12 वर्षांत पूर्णत: दूषित झाल्याने प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी जीवघेणी धावपळ करावी लागत आहे.
फुरसुंगी पॉवर हाऊस, घुलेवस्ती, रेल्वे स्टेशन, गणेशनगर, उत्तमनगर या भागाला बंदनलिकेतूनही पाणी पुरवठा होत नाही आणि टॅंकरचेही पाणीही अपुरे व अनियमित येत मिळत असल्याने या भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे .नागरी सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कचराडेपोबाधित भागाला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करून ठप्प झालेली विकासकामे पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाण्याचा धंदा…
या भागातील नागरिक दिवसभर अक्षरश: उपाशीपोटी तसेच सर्व काम-व्यवसाय सोडून पाण्याच्या टॅंकरची वाट पाहात असताना 100, 200 रुपयांत या भागातील हॉटेल्स, ढाबे, विविध कंपन्यांची गोदामे, कंपन्यांच्या टाक्या महापालिकेचे टॅंकर भरून देत आहेत. याच कारणातून टॅंकरचे पाणी अपुरे पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टॅंकरने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने सायकलला कॅन अडकवून किंवा डोक्यावर हंडा घेत नागरिकांना पाण्यासाठी जीवघेणी भटंकती करावी लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कचरा डेपोच्या नरकयातना सोसत आहोत. पालिकेकडून आम्हाला पुरेसे पाणीसुद्धा मिळत नाही, त्यामुळे टॅंकर येताच महिलांमध्ये पाणी भरण्यावरुन वाद-विवाद होऊन भांडणे होत आहेत. त्यामुळे पालिकेने किमान आम्हाला पिण्याचे पाणी तरी पुरेसे द्यावे.
– नीता घुले, सामाजिक कार्यकर्त्या