शिरूर : तालुक्यातील घोडनदी दुथडी भरून वाहू लागली असून अनेक ठिकाणी नदी पात्राबाहेर पाणी आले असून शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले घोड धरण 90 टक्के भरले आहे, त्यामुळे गोट धरणातून 19,800 क्युसेसने पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा शिरूर तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला असून धरणक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. गेल्या 26 जुलै पासून पाऊस कोसळत असून अद्याप अनेक भागात पाऊस चालूच आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे डिंबा धरण भरले आहे. डिंबा धरणातून 20,300 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोडनदीतील पाणी वाढल्याने नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कालपर्यंत 40-50 टक्के भरलेले घोड धरण दुपारपर्यंत जवळपास 90 टक्के भरले होते, त्यामुळे पूर नियंत्रणासाठी आज स. 11.00 वाजता घोड धरणाचे दरवाजे काही प्रमाणात उघडून घोड धरणातूनही 19,800 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोड नदीकाठच्या ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी व सतर्क रहावे, अशा सूचना डी.एन. साठे) उ.वि. अभियंता घोड पाटबंधारे, शिरूर ) यांनी दिली आहे.