बुधवार, 21 ऑक्टोबर. “नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या वेबसाइटवर जाहीर केलं की, ऑक्टोबर 26 रोजी ती चंद्राविषयी काहीतरी महत्त्वाची माहिती जगापुढे आणणार आहे. साहजिकच शास्त्रज्ञांचे डोळे तिकडे लागले आणि तो सोमवार कधी एकदा येतो असं त्यांना झालं. यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे नासाच्या सोफिया (स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्वेटरी फॉर इन्फ्रारेड ऍस्ट्रॉनॉमी) या दुर्बिणीकडून शास्त्रज्ञांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. बोईंग 747 विमानात काही बदल करून त्यात ही दुर्बीण बसवलेली आहे. सोफिया खूप उंचावरून फिरू शकते. त्यामुळे तिच्या निरीक्षणात पृथ्वीच्या वातावरणातल्या सूक्ष्म बाष्पकणांचे अडथळे येत नाहीत. जमिनीवरच्या दुर्बिणींना मात्र ही एक मोठी अडचण असते.
या आधी सोफियाने अनेक महत्त्वाचे निष्कर्ष आपल्याला दिलेले आहेत. एखादा तारा कसा जन्म घेतो, ताऱ्याकडून येणारे वारे आणि पृथ्वीवर पाणी कुठून आलं असेल, अशा अनोख्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सोफियाकडून खूप उपयुक्त डेटा मिळालेला आहे. सोफिया चंद्राविषयी निरीक्षण करते आहे, हे ठाऊक असल्याने नासाची जाहीर परिषद चंद्रावरच्या पाण्याविषयी असू शकते, अशी कुजबूज वाढायला लागली. मग केवळ शास्त्रज्ञच नव्हे, तर तुमच्या-आमच्यासारखे सगळे जण कुतुहलाने विचारायला लागले- “खरोखरच चंद्रावर पाणी असेल?’
सोमवारी दुपारी नासाची टेलिकॉन्फरन्स सुरू झाली. तिचं लाइव्ह प्रक्षेपण जगभर सुरू होतं आणि अपेक्षेप्रमाणे ही माहिती चंद्रावर पाणी आहे याविषयीच निघाली. अलीकडेच सप्टेंबर महिन्यात नासाने आपल्या आर्टेमिस मोहिमेचे पूर्ण तपशील जाहीर केले होते. चंद्रावर मानवी वसाहत उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याला आता 26 ऑक्टोबरच्या बातमीची साथ मिळाली आहे आणि आपण चंद्रावर राहू शकतो या स्वप्नाला दिवसेंदिवस बळकटी मिळत चालली आहे.
अवकाशातला आपला सख्खा शेजारी म्हणजे चंद्र. तिथे काय असेल, आपण तिथे जाऊ शकू का, तिथे राहू शकू का, असे प्रश्न माणूस कित्येक काळ उराशी बाळगून आहे. ज्यूल्स व्हर्न किंवा रॉबर्ट हाइनलाइनच्या विज्ञानकथांनी त्याविषयी खूप कल्पना रंगवल्या. हळूहळू अवकाश संशोधनाने नवनवी माहिती आपल्यासमोर आणली. त्यावरचा कळस म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी “अपोलो-11′ यानातून नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवल्याचा.
सुरुवातीच्या अवकाश मोहिमा अमेरिका आणि रशिया यांच्या असल्या, तरी गेल्या काही दशकांमध्ये इतर अनेक देश यात हिरीरीने भाग घेत आहेत. चीन, जपान, युरोपियन युनियन, लक्झेम्बर्ग, इस्रायल आणि अर्थात आपला भारत! तुम्हा सर्वांना आपली 2008 मधली “चांद्रयान-1′ मोहीम आठवत असेल. अत्यंत कमी खर्चात, स्वदेशी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात बर्फाचे मोठे साठे असल्याचा ऐतिहासिक निष्कर्ष आपण जगापुढे आणला होता.
चंद्रावर पाणी असल्याचा पहिला पुरावा दिला तो अमेरिकेने. तेव्हा माणूस चंद्रावर उतरला नसला तरी अपोलो मोहिमांमधून चंद्रावरचे काही खडक नमुने म्हणून पृथ्वीवर आले होते. कॅलटेक या संशोधन संस्थेतल्या तीन शास्त्रज्ञांनी या नमुन्यांचं विश्लेषण करून चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात बर्फ असण्याचा अंदाज 1961 मध्ये वर्तवला होता. त्यानंतर नाव घेता येईल रशियाचं. ऑगस्ट 1976 मध्ये रशियाचा ल्यूना-24 प्रोब चंद्रावर उतरला. त्याने चंद्राच्या पृष्ठभागाखालची सहा फूट खोलपर्यंतची सॅम्पल्स घेतली आणि पृथ्वीवर परत आणली. या नमुन्यांच्या चाचण्या घेऊन रशियाने 1978 मध्ये जाहीर केलं की, त्यात एक दशांश टक्के पाणी आढळलं आहे. ही खूपच रोमांचक बातमी होती.
मार्च 1971 मध्ये अपोलो-14 यानाने चंद्राच्या पृष्ठभागाजवळ बाष्पकण असल्याचं मास स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाच्या मदतीने सिद्ध केलं होतं. पुढे नवनवं तंत्रज्ञान आणि अधिक अचूक उपकरणं उपलब्ध झाल्यावर पाण्याचं अस्तित्व टिपण्याचं काम थोडं सोपं झालं. 1994 मध्ये अमेरिकेच्या मिलिटरी प्रोबने रडार वापरून चंद्राच्या न दिसणाऱ्या अंधाऱ्या भागात बर्फरूपात पाणी असल्याचं सिद्ध केलं. संगणकाच्या सहाय्याने सिम्युलेशन वापरून तिथे सुमारे चौदा हजार चौरस किमी प्रदेशात बर्फ असण्याची शक्यता पुढे आली. पुन्हा एकदा सगळ्यांची आशा पालवली. पाणी आहे तर जीवन असेल. तिथे सजीव असतील, तग धरू शकत असतील, तर आपणही तिथे जाऊन वसाहत उभी करू शकतो ही कल्पना भलतीच आकर्षक होती. मग 2008 मध्ये चंद्रावरून आणलेल्या खडकांचा नव्या तंत्राने अभ्यास झाला. तेव्हा त्यात पाण्याचे प्रत्यक्ष रेणू आढळले आणि मग या दिशेने आणखी प्रयत्न सुरू झाले.
त्याच वर्षी 2008 मध्ये भारताने एक नवा विक्रम नोंदवला. चांद्रयान-1 ही आपली पहिलीच चांद्रमोहीम आणि आपण चंद्रावर पाणी असल्याचा सबळ पुरावा सादर केला. तोही केवळ एका ठिकाणी नाही, तर चंद्राचं बाह्यावरण, पृष्ठभाग, त्याच्या थोड्या खोलीवर आणि जमिनीत अतिशय खोलवर अशा चारही ठिकाणी पाणी असल्याचं आपल्या संशोधकांनी सिद्ध केलं. ही खरोखरीच अभूतपूर्व कामगिरी म्हटली पाहिजे.
चांद्रयान-1 मोहिमेतल्या मून इम्पॅक्ट प्रोबने चंद्राच्या बाह्यावरणामधून (एक्झोस्फीअर) मधून अत्यल्प काळ प्रवास केला. त्यादरम्यान त्यावरील मास स्पेक्ट्रोमीटर उपकरणाने मिळवलेल्या डेटाच्या आधारे या बाह्यावरणात सूक्ष्म बाष्पकण असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शॅकलटन विवरात जाऊन आदळला. चंद्राच्या पृष्ठभागावर खोल विवरं आहेत. त्यातल्या काहींची रचना अशी आहे की तिथे सूर्याचा प्रकाश कधीच पोहोचत नाही. तिथे तीन-चार अब्ज वर्षांपूर्वीपासून पाण्याचे रेणू साठून राहिले असल्याचा अंदाज होता. मून इम्पॅक्ट प्रोबच्या प्रत्यक्ष निरीक्षणावरून त्या खोलीवर बर्फस्वरूपात पाणी असल्याचा निष्कर्ष आपण मांडला होता.
चांद्रयान-1 वर मून मिनेरालॉजी मॅपर उपकरण होतं. चंद्राच्या प्रकाशित बाजूवर परावर्तित प्रकाशात या उपकरणाला पाण्याच्या वर्णपटाच्या खुणा (स्पेक्ट्रल सिग्नेचर) मिळाल्या. दोन-अडीच मायक्रॉन इतक्या सूक्ष्म खुणांच्या अभ्यासावरून चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचं अस्तित्व असल्याचं आपण दाखवून दिलं होतं. पृष्ठभागाखाली काही मीटर खोलीवर पाणी असेल तर ते मिळवणं सर्वात सोपं समजलं जातं. चांद्रयान-1 वरच्या सिन्थेटिक ऍपर्चर रडार उपकरणांनी ध्रुवप्रदेशात सखोल मॅपिंग केल्यावर या खोलीवर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.
आता 26 ऑक्टोबर रोजी नासाच्या सोफिया दुर्बिणीने चंद्राच्या दक्षिण गोलार्धातल्या क्लॅविअस या एका मोठ्या विवरात पाण्याचं अस्तित्व शोधलं आहे. या प्रकाशित भागात पाणी मिळाल्याची ही बातमी उत्साहवर्धक आहे खरी! आता हळूहळू तपशील बाहेर येतील. या माहितीचा अनेक पैलूंनी अभ्यास होईल. त्याचे संदर्भ घेऊन पुढील मोहिमा जाहीर होतील. हे पाणी वापरायला मिळवण्याच्या कल्पना पुढे येतील. आर्टेमिस प्रकल्पातले सगळे अधिक उत्साहाने कामाला लागतील. “चंद्रावरचं पाणी’ हे आता केवळ शब्दश: नाही, तर खरोखरीच जीवन ठरणार आहे!
कुतूहल
मेघश्री दळवी