चौकट म्हणजे काय, तर बंधनं. माझ्या एका कवितेत, “तुला चौकटीचं घर हवं आहे की, बिन चौकटीची धर्मशाळा?’ हा प्रश्न मी तिला विचारलेला आहे, पण ही कविता केवळ तिची नाही. मुळात तिलाच चौकट असावी आणि त्याला असू नये, असं तर अजिबात नाही. चौकटीचं बंधन सगळ्यांनीच पाळायला हवं. कारण असं बंधन पाळण्यात कुटुंबाचं, समाजाचं आणि संस्कृतीचं हित दडलेलं आहे.
चौकट म्हणजे निव्वळ बंधनं असं तर नव्हेच, पण चौकट म्हणजे केवळ नियम असंही नव्हे. चौकटीबाहेर आभाळ असतंच. चौकटीतून बाहेर पडलं की ते आभाळ कवेत घेता येतं. त्या आभाळात मुक्त विहार करता येतो. मोकळ्या आभाळात मनासारखी झेप घेता येते. मनासारखं हुंदडता येतं, पण आभाळाखाली निवारा नाही भेटत. निवाऱ्यासाठी घरट्याची ऊब हवीच असते. त्यामुळेच घरटं आलं की त्याला दार येतंच. दार आलं तर चौकटसुद्धा येतेच. दार असण्यासाठी गरज असते ती चौकटीची. चौकटीची मर्यादा पाळली की स्वातंत्र्याचं दार उघडणं सोपं जात.
आपण स्वतःच आपल्याभोवती अनेक चौकटी आखून घेतो. उदा., असा माणूस नको. तसा मित्र नको. असा शेजारी नको. सोबतीला तसा प्रवासी नको. कारण आपल्याला कुणाच्या सोबत राहायला आवडेल याची एक चौकट आपल्या मनाने आखून घेतलेली असते. त्या चौकटीबाहेरचं कुणी त्या चौकटीत येत असेल तर त्याला आपण टाळतो. वेळ आली तर नाकारतोसुद्धा. कारण त्यात आपलं मानसिक संतुलन, आपली सुरक्षितता दडलेली असते. दरवाजाची चौकट आपल्याला दिसते, पण अशा न दिसणाऱ्या कितीतरी अदृश्य चौकटी आपण आपल्या भोवती आखून घेतलेल्या असतात. त्यामुळेच चौकट नेहमीच दृश्य असते असं नव्हे, तर बऱ्याचदा ती अदृश्यसुद्धा असते, असं म्हणावंसं वाटतं.
वनवासात सीतेच्या पर्णकुटीबाहेर लक्ष्मणानं आखलेली लक्ष्मणरेषा ही एक चौकटच होती. सीतेने कांचनमृगाचा हट्ट केल्यानंतर लक्ष्मण त्या मृगाच्या शिकारीला निघाला. जाताना त्याने पर्णकुटी बाहेर एक रेष आखली. सीतेमाईला, “काहीही झालं तरी ही रेषा ओलांडू नका. ही रेषाच तुमचं रक्षण करेल.’ अशी विनवणी केली. पण संन्यास्याचं रूप घेऊन आलेल्या रावणाला सीतामाई ओळखू शकली नाही. धर्म करायचा म्हणून सीतेने चौकट ओलांडली आणि मग पुढचं रामायण घडलं. मनुष्य देहधारण केलेल्या श्रीरामाला भगवान विष्णूच्या अवताराची चौकट होती. म्हणून श्रीराम सीतेचं रक्षण करू शकले. रावणाचा पराभव झाला आणि सीतेची रावणाच्या कैदेतून सहीसलामत सुटका झाली.
द्यूत हा मनोरंजनासाठी खेळायचा खेळ. पैसा-अडका, धन-दौलत, जमीन-जुमला अशा गोष्टी द्युतात पणाला लावू नये. ही आपण ठरवून घेतलेली चौकट, पण कौरवांना द्युतात हरवू आणि युद्ध न करता, रक्तपात होऊ न देता आपलं हस्तिनापूरचं राज्य परत मिळवू, या अभिलाषेपोटी पांडवांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलं. नियम मोडला की विनाश अटळ असतो. साहजिकच पांडवांनी नियम मोडला. सर्वस्व गमावल्यानंतर आता काय करायचं, असा संभ्रम निर्माण झाला. बुद्धिभ्रम झालेला माणूस नेहमीच टोकाचा निर्णय घेतो. पांडवांनी आपल्या पत्नीला द्रौपदीला पणाला लावलं आणि मग महाभारत घडलं. आता तिथेही भगवान विष्णूंचा अवतार असलेले श्रीकृष्ण पांडवांच्या पाठीशी उभे राहिले. म्हणून अधर्माने वागणाऱ्या कौरवांचा विनाश झाला. धर्माची चौकट सांभाळणाऱ्या पांडवांचा विजय झाला.
कर्णाची कवच कुंडलं ही देखील एक स्वरूपाची चौकट होती. “दानशूर’ या आपल्या लौकिकाला कलंक लागू नये म्हणून कर्णाने सूर्याला कवचकुंडलं दान केली. कवचकुंडलाच्या रूपातल्या चौकटीचा त्याग केला म्हणून कर्णाचा विनाश झाला. ही तिन्ही उदाहरणे आपण चौकटीची मर्यादा पाळणे किती गरजेचे आहे, हेच अधोरेखित करतात. ते सगळेच दैवी अवतार होते. तरीही त्यांनी चौकटीच्या मर्यादा पाळल्या. त्यांनी चौकटीच्या मर्यादा पाळल्या म्हणून धर्माने अधर्मावर विजय मिळवला. आपण तर सामान्य मनुष्य आहोत. आपण सामाजिक चौकटीची, संस्काराची, संस्कृतीची मर्यादा नाकारून कसे चालेल?
तशी चौकट कोणालाच नकोशी असते. मुलांना आई वडिलांच्या शिस्तीची चौकट नकोशी असते. सुनेला सासूची-नंदा-दिरांची चौकट नकोशी असते, पतीला पत्नीच्या बंधनांची चौकट नकोशी असते. पत्नीला पतीच्या अधिकाराची चौकट नकोशी असते. वाहनचालकांना सिग्नलची चौकट नकोशी असते. माणसाला घड्याळाच्या काट्यांची चौकटसुद्धा नकोशी असते. त्यामुळेच अलीकडे उन्हं वर आली तरी माणसं झोपून राहतात आणि मध्यान्ह रात्र झाली तरी टक्क जागी असतात.
पण निसर्ग मात्र कधीच चौकट सोडून वागत नाही. उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि पावसाळ्यानंतर हिवाळाच येतो. दिवसानंतर रात्र येते. पृथ्वी सूर्याच्या परिक्रमेची चौकट नाकारत नाही. म्हणून दिवस-रात्रीची परिक्रमा विनाखंड सुरू आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहतो. नदी किनाऱ्याची चौकट सांभाळून वाहते. मासे प्रवाहाची आणि पाण्याची चौकट सांभाळतात. प्रवाहाची चौकट सोडून बाहेर जायला हवं असं माशांच्या मनात येत असेल ना, पण मासे कधीही पाण्याची चौकट सोडून बाहेर येत नाहीत. कारण चौकट ओलांडणं म्हणजे आपल्या जीवनाची आहुती, याची जाणीव त्यांना असते.
समुद्र त्याच्या तटाची मर्यादा सांभाळतो. झाडांची मुळे मातीची चौकट सांभाळतात आणि यातल्या कुणीही आपली चौकट नाकारली की विध्वंस ठरलेला असतो. नदीने तिचा किनारा सोडला तर पूर येतो आणि किनाऱ्यावरची घरे-दारे, शेती वाडी उद्ध्वस्त करतो. समद्राच्या लाटा अक्राळ विक्राळ रूप धारण करून समुद्रतटाची चौकट मोडून काढतात तेव्हा समुद्र किनाऱ्यावरच्या साऱ्यांना पोटात घेतो. उरतात ते केवळ होत्याचे नव्हते झाल्याचे अवशेष.
प्रत्येकाने चौकटीच्या मर्यादा सांभाळण्यातसुद्धा सुख आहे. कारण चौकट म्हणजे पायातील शृंखला नसतात. चौकट म्हणजे पायातील पैंजण असतात. जी आयुष्याला नादमय सोबत करतात. चौकटीला आपण अनेकदा ठेचाळतो, ठेच लागल्यावर तीच चौकट कवेत घेऊन कुरवाळतेदेखील. अनेकदा तर चौकट आपल्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपते. तिनेच नव्हे. तुम्ही, मी, आपण प्रत्येकाने आपापली चौकट सांभाळायलाच हवी. कारण चौकट नेहमीच संरक्षण करते विध्वंस करत नाही.
आरसा
विजय शेंडगे