पाकिस्तानमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे की पोलीस आणि लष्कर यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे, गोळीबार झाला आहे. पहिल्यांदाच स्थानिक पोलीस लष्कराच्या विरोधात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हा सर्व प्रकार घडला आहे. सिंध प्रांतात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या जात आहेत. इम्रान यांनी आमची रोटी-कपडा-मकान हिरावून घेतले आहेत, असे आरोप करत घोषणाबाजी केली जात आहे.
इम्रान खान यांना आणि लष्कराला आमच्यावर राज्य करण्याचा अजिबात हक्क नाही, असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. एक प्रकारे पूर्णपणे स्वायत्ततेची मागणी येथील नागरिक करत आहेत. इम्रान खान आणि नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान हा पूर्णपणे चीनकडे गहाण टाकला आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे नवाझ शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेतृत्व करीत आहेत. त्यांची प्रसिद्धी वाढते असून त्यांना लोकमान्यता मिळते आहे.
या सर्व अराजक परिस्थितीमुळे पाकिस्तानात नागरी युद्ध भडकते की काय, पाकिस्तानचे तुकडे पडताहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रकारची विरोधी निदर्शने गिलगिट बाल्टिस्तानमध्येही झाली आहेत. बलुचिस्तानमध्येही सर्वत्र खदखद आहे. तेथे तर पाकिस्तानविरोधात हाती शस्त्र घेण्यात आली आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून काही ठिकाणी हल्ले देखील होताहेत. दुसरीकडे, अख्खा सिंध प्रांत पेटून उठला आहे. पाकिस्तानात पोलीस आणि लष्कर यांच्यात झालेला संघर्ष हा कोणीही चिथावल्यामुळे झालेला नसून उत्स्फूर्त होता, हे लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तानात सिंधला प्रत्येक गोष्टीत डावलण्यात येत आहे. कराचीमधील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली आहे. सिंध प्रांतातील सर्वच पोलीस ठाणी लष्कराने ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे लष्कराने मान्य केले असले तरीही पोलिसांत मोठ्या प्रमाणावर खदखद आणि असंतोष दिसून येतो आहे.
लष्कराविरोधातला असंतोष वाढत असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातही जनतेत प्रचंड राग आहे. इम्रान यांनी निवडणुकांच्या काळात रोटी, कपडा, मकान यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. भुट्टो घराणे किवा शरीफ घराणे यांनी पाकिस्तान विकला आहे, त्यांनी स्वतःच्या मोठ्या संपत्ती परदेशांमध्ये घेतल्या आहेत; परंतु मी मात्र जनसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे, असे सांगत इम्रान यांनी पाकिस्तानातील जनतेला साद घातली होती. सामान्य नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा देण्याची हमी दिली होती. पण आज त्याच इम्रान खान यांनी चीनकडे आख्खा देश गहाण टाकल्याची भावना देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे.
सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा खंदा आणि पारंपरिक पाठीराखा देश होता; पण आता या देशाने पाकिस्तानकडे पाठ फिरवली आहे. पाकचे अमेरिकेबरोबरचे संबंधही तणावपूर्ण झालेले आहेत. आता केवळ चीनच्या गुंतवणुकी पाकिस्तानात आहेत. पाकिस्तान हा चीनचा “क्लायंट स्टेट’ बनला आहे. उत्तर कोरियाप्रमाणे पाकिस्तान चीनच्या हातचे बाहुले बनला आहे. चीनच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबल्याने पाकिस्तान चीनची हरेक गोष्ट ऐकतो आहे.
कराचीमध्ये जो असंतोष निर्माण झाला तो चीनमुळेच आहे. कराची बंदराच्या आसपासच्या सर्वच ठिकाणी चीनने आपले प्रभुत्व निर्माण केले आहे. चीनच्या बोटी तिथे येऊन मासेमारी करू लागल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या रोजीरोटीवर परिणाम होतो आहे. हाच प्रकार बलुचिस्तानात आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये घडतो आहे. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये चिनी लष्करी अधिकाऱ्यांनी संपत्ती खरेदी केल्या आहेत. चीन- पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्र जे गिलगिट बाल्टिस्तानमधून ग्वादार बंदरापर्यंत जाते. त्या माध्यमातून चीनने पाकिस्तानवर आपले संपूर्ण प्रभुत्व निर्माण केले आहे. भिकेकंगाल झालेला पाकिस्तान चीनच्या कर्जाच्या विळख्यात पूर्णतः अडकला आहे. त्यामुळे आर्थिक क्षमता नसतानाही पाकिस्तानला भारताच्या विरोधात कुरघोड्या कराव्या लागताहेत. आपला पराभव होणार हे माहीत असूनही आणि भारताविरोधातील कोणतेही युद्ध परवडणारे नसतानाही पाकिस्तान भारताविरुद्ध कुरघोड्या करत आहे.
अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आलेली असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनला खूश ठेवण्यासाठी मनमानी निर्णय घेत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा पाय खोलात चालला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानी लष्कराचा पाकिस्तानच्या अंतर्गत जीवनावर जो दबदबा होता त्याला सुरूंग लागण्यास सुरुवात झाली आहे. आज पाकिस्तानच्या लष्करामध्ये प्रामुख्याने पंजाबी आणि पख्तून याच दोन प्रांतातले अधिकारी जास्त आहे. त्यामध्ये सिंध प्रांताचे प्रतिनिधित्व नाहीये.
बलुचचे प्रतिनिधित्व कमी प्रमाणात आहे; तर गिलगिटचे प्रतिनिधित्व मुळीच नाही. त्यामुळे पंजाबी आणि पख्तून लोक आपल्यावर अधिकार गाजवतात, आपले हक्क हिरावून घेतात अशी भावना तिथल्या लोकांच्या मनात वाढते आहे. त्यामुळेच लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आहेत. पण असे प्रकार घडल्यास लष्कर त्यात हस्तक्षेप करते. लष्कर सरकारला बाजूला करून स्वतःच राज्य हातात घेते, हे आजवरचे चित्र होते. आता परिस्थिती वेगळी आहे. लोकांच्या मनात लष्कराविरोधातच खदखद आहे. त्यामुळे लष्कर आणि लष्कर पुरस्कृत इम्रान खान सरकार या दोघांच्या विरोधात असंतोष असल्याने नेमक्या कोणत्या प्रकारची चळवळ तिथे आकाराला येते आहे, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
इम्रान खान अंतर्गत पातळीवर संघर्षाचा सामना करत आहेतच; पण जागतिक पातळीवर त्यांना आणखीही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. “फिनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स’ची महत्त्वपूर्ण बैठक बीजिंगमध्ये झाली. त्या बैठकीत पाकिस्तान “ग्रे लिस्ट’मधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. कारण ग्रे लिस्टमध्ये आल्यामुळे पाकिस्तानात परकीय गुंतवणूक अजिबात येत नाहीये. आज कोणताही देश पाकला कर्ज द्यायला तयार नाहीये. जागतिक बॅंकही कर्ज देत नाहीये. पण ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी इतर देशांच्या समर्थनाची गरज आहे. चीनव्यतिरिक्त इतर कोणतेही देश फारसे उघडपणे पाठीशी नसल्याने इम्रान खान यांची चिंता कमालीची वाढली आहे. पण भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच कायम राहिला आहे. यामुळे इम्रान यांच्या चिंता वाढल्या आहेत. पाकिस्तानात अंतर्गत परिस्थिती हाताळण्यात इम्रान खान यांना अपयश आले आहे. पाकिस्तानातील परिस्थिती ही नागरी युद्धाच्या जवळपास पोहोचली आहे.
एकूणच पाकिस्तानला एकत्र बांधून ठेवण्यातही इम्रान खानना अपयश आले आहे. लष्कराचा दबदबा किंवा भीती लोकांमध्ये आता राहिलेली नाहीये. उलट अविश्वास आणि असंतोष वाढू लागला आहे. तरीही पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणे काही थांबत नाहीये. भारतात दहशतवादी घुसवणे किंवा चीनच्या चिथावणीवरून भारतामध्ये अस्थिरता निर्माण करणे हे उद्योग पाकिस्तान करतच आहे.
पाकिस्तानातली परिस्थिती अशीच राहिली आणि जनतेच्या मनातील क्षोभ असाच वाढत राहिला, तर तिथे आतापर्यंत सत्ता गाजवणारे लष्कर, धार्मिक मूलतत्त्ववादी संघटना आणि दहशतवादी गट यांच्या साम्राज्याला सुरूंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानी सामान्य नागरिकांना आता बदल हवा आहे. आजवर भारताचा खुळखुळा करून मत मागणे, काश्मीरचा भावनिक मुद्दा करून जनतेची मते मागणे हेच उद्योग सत्ताधाऱ्यांनी केले; परंतु या सर्वांत सामान्य पाकिस्तानी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. आता इम्रान खान यांना भारत किंवा काश्मीर हा मुद्दा उगाळून जनतेच्या उद्रेकाला शांत करता येणार नाही.
आज पाकिस्तानला वाचवणारे फार देश शिल्लक राहिलेले नाहीत. सौदी अरेबियाने साथ सोडली आहे, अमेरिका नाराज आहे. एकटा तुर्कस्तान पाठिंबा देत असला तरीही त्या देशाची वैयक्तिक प्रतिमा अत्यंत डागाळलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान जितका चीनच्या आहारी जाईल त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत. श्रीलंकेत जे घडले तसाच प्रकार पाकिस्तानच्या बाबतीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थिती सावरण्यासाठी इम्रान खान यांनी त्वरित पावले उचलली नाहीत तर पाकिस्तानात फूट पडणे टाळता येणार नाही.
कव्हर स्टोरी
डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
परराष्ट्र धोरण विश्लेषक