मलठण : दौंड तालुक्यातील पूर्व भागामध्ये मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर, वाटलूज, नायगाव तसेच अन्य गावांमध्ये प्रचंड दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. भीमा नदी पात्र पाण्याविना कोरडेठाक पडल्याने परिसरातील शेत पिके पाण्याविना जळून चालले आहेत. नागरिकांना व पशुधनांना पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. परिसरातील विहिरींनी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. एकूणच या परिसराला दुष्काळाच्या झळा तीव्र जानवू लागल्या आहेत.
गेल्या वर्षी कमी पावसामुळे या भागातील जीवनदायी असलेले उजनी धरण जेमतेम 60 टक्क्यांच्या आसपास भरले होते; परंतु प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार व वातावरणातील प्रचंड तापमानामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस उजनी बॅकवॉटरच्या टोकाची काही गावे जास्त प्रभावित झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरण साखळीतील काही धरणांमध्ये काहीसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील भामा आसखेड धरणातून अठ्ठावीस दिवस भीमा नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले. तोपर्यंत भीमा नदीतील उजनी बॅक वॉटर च्या वरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांमधील पाणी काहीसे कमी झाले होते. भामासखेड धरणातील पाणी शेवटच्या बंदरापर्यंत पोचले की लगेच पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला.
भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले तरी ज्या भागातील शेतकर्यांना पाण्याची गरज होती, त्यांच्यासाठी मात्र ते मृगजळ ठरले. म्हणजे ज्यांना पाणी होते त्यांनीच पुन्हा आपापले बंधारे पाण्याने पूर्ण भरून घेतले.
दरम्यानच्या काळात दौंड व कर्जत तालुक्यातील शेतकरी लोकप्रतिनिधींना वारंवार पाणी प्रश्न बाबत लक्ष घालण्याची मागणी करत होते. परंतु लोकसभेच्या निवडणुकांमुळे, आचारसंहितेचे कारण देत या प्रश्नाला बगल दिली. शेवटी शेतकर्यानं कोणीच वाली नसल्याची जाणीव बळीराजाला झाली. भीमा नदीच्या मुबलक पाण्यामुळे ऊस हे मुख्य पीक या भागातील शेतकरी घेतात. भीमा नदीमुळे हा भाग उत्पादनात अग्रेसर आहे. दौंड तालुक्यात दौंड शुगर, भीमा पाटस, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराग शुगर हे साखर कारखाने आहेत. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकर्यांचे कमालीचे नुकसान होऊन उत्पादनात प्रचंड घट होणार आहे.
भामा आसखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे ते दौंड तालुक्यातील पूर्व भागापर्यंत पोहोचलेच नाही. ज्या भागातून विसर्ग करण्यात आला त्या परिसरातील इलेक्ट्रिक मोटर पंपांचा विद्युत पुरवठा निम्म्याने कमी करायला हवा होता. असे केले असते तर पाणी जास्त दाबाने मलठण परिसरात पोहोचले असते. शेतकर्यांचे प्रचंड होणारे नुकसान टाळता आले असते.
-शशिकांत शेळके, माजी चेअरमन विकास सोसायटी मलठण
कमी पर्जन्यमान व दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये बुडीत बंधार्याचा उजनी बॅक वॉटरच्या शेतकर्यांना खूप फायदा होईल. त्यामुळे शासन स्तरावर तातडीने निर्णय घेऊन बुडीत बंधारे बांधणीसाठी तात्काळ निर्णय घ्यावा. नाही तर धरण उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांची होईल.
-गणेश गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य हिंगणीबेर्डी/काळेवाडी