पुणे – राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी “वॉटर बेल’ उपक्रम राबवण्यावर अखेर शालेय शिक्षण विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
शरीरात आवश्यक तेवढे पाणी न प्यायल्यामुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. मुलांनी दीड ते दोन लिटर पाणी प्यावसास हवे आहे. मात्र, हे प्रमाण मुलांचे वय, उंची व वजनानुसार बदलत जाते. घरुन भरुन नेलेली पाण्याची बाटली मुले तशीच घरी परत आणतात, अशी पालकांकडून अनेकदा तक्रार करण्यात आली होती.
पाणी कमी प्यायल्यामुळे मुलींच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, मूत्रमार्गात संसर्ग, मूतखडा, चिडचिडपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. हे टाळता यावे, यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी शासनाकडूनच हालचाली सुरू आहेत. विविध जिल्ह्यांमधील सर्वच शाळांमध्ये “वॉटर बेल’ या उपक्रमाची अंमलबजावणी करावी लागणार असून, त्याबाबतचा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर करण्याचे बंधनही शाळांना घालण्यात आले आहे.
वेळेवर स्वच्छतागृह वापरण्याची मुभा आवश्यक
शाळेतील मुले अभ्यासाच्या व खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरुन जातात. पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी घंटा वाजविण्याच्या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा घंटा वाजवण्याबाबत मुख्याध्यापकांना वेळ निश्चित करावी लागणार आहे. या राखीव वेळेत मुलांना आवश्यकतेनुसार पाणी पिता येणार आहे. यातूनच पाणी पिण्याविषयीची मानसिकता तयार होणार असून त्याची सवय निर्माण होणार आहे. मुलांना वेळेवर स्वच्छतागृह वापरण्याची मुभा द्यावी लागणार आहे.