त्वरीत झाडे-झुडपे काढण्याची ग्रासस्थ, प्रवाशांची मागणी
वेल्हे – येथील खानापूर – पाबे रस्त्याला धोकादायक काटेरी झाडा-झुडपांनी विळखा घातला आहे. या रस्त्यावर असलेल्या वळणावर झाडांमुळे रस्ता दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालकांना झाडा-झुडपांचा अडसर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या रस्त्यावरील वाढलेली झाडे-झुडपे त्वरीत काढून टाकावीत, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांमधून केली जात आहे.
खानापूर-पाबे मार्गे पुण्याला जाणारा हा जवळचा मार्ग आहे. तसेच राजगड, तोरणागड, शासकीय कार्यालय, पर्यटन आदी ठिकाणे याभागात असल्यामुळे नागरिक व पर्यटक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. पाबे घाट उतरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो.
मात्र या रस्त्याच्या कडेला दाट झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरुन येणारे वाहन वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे स्त्यालगत असणारी झाडे-झुडपे तातडीने काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे. परिणामी या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामार्गावर झाडा – झुडपांमुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. याचा नाहक त्रास प्रवासी, पर्यटकांना करावा लागत आहे.