ग्रामपंचायतीच्या वतीने दुकानदारांना कारवाईचा इशारा
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली परिसरामध्ये दुकानदारांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने चालू ठेवावी अशा स्पष्ट सूचना वाघोली ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने दिल्या असतानाही सायंकाळी ५ नंतर दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदारांना ग्रामपंचायतीच्या वतीने अंतिम सूचना देण्यात आली आहे. यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा माजी सरपंच शिवदास उबाळे यांनी दिला आहे.
हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाघोली परिसरातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच चालू ठेवण्याच्या सूचना वाघोली ग्रामपंचायत व लोणीकंद पोलिसांच्यावतीने दुकानदार, व्यापाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. बहुतांश दुकानदार सायंकाळी ५ नंतर दुकाने बंद करीत आहेत तर काही दुकानदार ५ नंतर दुकाने बंद करीत नाही.
ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी वारंवार पुकारावे लागते. सायंकाळी काही दुकाने बंद करीत नसल्याने ग्रामपंचायतीने अंतिम सूचना दिली आहे. यापुढे सायंकाळी दुकाने चालू ठेवणाऱ्यांचा परवाना १५ दिवसांसाठी रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.