मुंबई – राज्यात सध्या क्षणाक्षणाला राजकारण बदलताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये युती आणि आघाड्यांमुळे महाराष्ट्राचे वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे.याचा नोकरदार वर्गापासून ते विद्यार्थी,बेरोजगार अशा समाजातील प्रत्येक घटकांवर परिणाम होताना दिसून येत आहे. अशात एमबीबीएस करणाऱ्या एका तरुणाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात या विद्यार्थ्याने राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे.
विशाल ढेबे असं या पत्र लिहिणाऱ्या भावी डॉक्टरचं नाव असून तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या विशाल गोंदिया येथील मेडिकल कॉलेमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. सध्या महाराष्ट्रात राजकारण्यांनी केलेल्या राजकीय चिखलाचा व्यथित होऊन विशालने स्वतःच्या रक्ताने राज ठाकरेंना पत्र लिहिल्याचे समजते.
काय म्हंटलंय नेमकं पत्रात
महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली आहे. राजकारणी हे ज्वलंत प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहेत. स्वतःच्या हितासाठी राजकारण करत असून एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण त्यांनी सुरू केले आहे. समृद्धी महामार्गावर एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा आपले लोकप्रतिनिधी हे शपथविधी घेतात. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न असून महिला सुरक्षित नाही, अशा भावना विशालने पत्रात व्यक्त केल्या आहेत.
विशालने आपल्या पत्रात राज ठाकरेंनी महाराष्ट्राची धुरा हातात घेण्याची विनंती देखील केली आहे. रक्ताने लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलच चर्चेचा विषय ठरत आहे.