हिमांशू
करोना हा एक “व्हायरल डिसीज’ आहे असं का म्हणतात, हे हळूहळू लक्षात येऊ लागलंय. खरं तर “व्हायरल’ हा शब्द “व्हायरस’ शब्दावरून आलेला आहे, हे आपण सर्वजण जाणतो. सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या आजारांमध्ये “बॅक्टेरियल’ आणि “व्हायरल’ म्हणजे जीवाणूजनित आणि विषाणूजनित असे दोन भाग पडतात आणि करोना हा विषाणूमुळे होणारा आजार आहे म्हणून त्याला “व्हायरल डिसीज’ म्हणतात. इतकी प्राथमिक माहिती देण्याची वास्तविक काहीच गरज नव्हती; पण तरीसुद्दा स्वतःच स्वतःला वारंवार द्यावी अशी ही माहिती आहे. कारण समाजप्रिय प्राणी असणाऱ्या माणसाचं खऱ्या अर्थानं “सोशलीकरण’ सुरू झालं, म्हणजे समाजापासून तुटून माणसानं जेव्हा स्वतःभोवती स्वतःचा असा आभासी समाज बनवायला सुरुवात केली, तेव्हापासून बऱ्याच शब्दांचा अर्थ बदललाय आणि “व्हायरल’ हा त्यापैकी महत्त्वाचा शब्द होय.
एकमेकांशी थेट बोलण्याची सतत गरज भासावी इतके आपण बोलघेवडे होतो (हा काळ इसवी सनापूर्वीचा नसून अगदीच सात-आठ वर्षांपूर्वीचा आहे) त्यावेळी या शब्दाची आपल्याला भीती वाटत होती; पण “अंगठेबहाद्दर’ झाल्यापासून आपल्याला याच शब्दाची मजा वाटते, हा बेसिक फरक आहे. या पार्श्वभूमीवर, करोनाचा व्हायरस नेमका कसा, कुठे आणि किती पसरतो आहे याबद्दल फसगत होण्याच्या शक्यता बऱ्याच वाढल्या आहेत. म्हणूनच किमान जीवावर बेतलेलं असताना तरी आपण काही गोष्टी गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत.
“अफवांवर विश्वास ठेवू नका,’ या वाक्याला अर्थ असण्याचा एक काळ होता. (तोही फार जुना नाही.) सध्या मात्र बारकाईनं विचार केल्यास या वाक्याचं हसू येतं. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन विविध यंत्रणा केवळ उपचार म्हणून करतात की काय, असा संशय येण्याजोगी परिस्थिती आहे. कारण माहितीचा स्फोट झालेला असला तरी ज्ञानाचा स्फोट झालेलाच नाही. मिळालेल्या माहितीवर मेंदूत प्रक्रिया होऊन ज्ञान तयार होतं, असं म्हणतात. परंतु कृत्रिम मेंदू तयार करण्याच्या खटपटीत हल्ली आपला मेंदू व्यग्र आहे. त्यामुळे कदाचित माहिती आपल्या मेंदूला धडकून बाहेरच्या बाहेर निघून जाते की काय, असा प्रश्न पडतो.
अशा प्रकारे “धडकून जाणाऱ्या’ माहितीला हल्ली “व्हायरल माहिती’ म्हणतात. ती “बातमी’ आहे की “अफवा’ आहे, हे ठरवणंच जिथं कठीण, तिथं विश्वास ठेवण्या-न ठेवण्याचा प्रश्नच कुठे येतो! “लांडगा आला रे आला’सारखी अवस्था झालीय. अशा स्थितीत करोना विषाणूंनी जगभर भटकण्यासाठी चीनबाहेर पडावं, म्हणजे शंकाकुशंकांच्या पिकाची पेरणीच! हे जंतू प्राण्यांच्या शरीरातून आले की माणसानं मुद्दाम तयार केले, इथंपासून चर्चा झडू लागल्या. आपल्याकडे तर अशा संकटाच्या घडीलाही अनेकांची विनोदबुद्धी जागी झाली. बाजारात मृत्यूसुद्धा “मेड इन चायना’ आलाय, अशी कोटी काहींनी केली तर काहींनी होळी साजरी करू नका असं सांगायला सुरुवात केलीय. होळीचे रंग आणि अन्य सामग्री चीनमधून येते, हे कळल्यापासून अनेकजण बिथरलेत आणि रंग भारतीय आहेत, हे सिद्ध कसं करायचं हे दुकानदारांना समजेनासं झालंय. करोनावर घरगुती उपचार सांगणारेही उगवू लागलेत. शेणाची महती सांगणाऱ्यांना नवा उत्साह आलाय. स्वयंघोषित सोशल मीडिया तज्ज्ञांचाही सुळसुळाट आहे. हा “व्हायरल डिसीज’ अधिक घातक! काळजी घ्या, एवढंच सांगणं!