गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन
मुंबई : करोना हा महाराष्ट्राचाच नव्हे, तर जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. पण या आपत्तीचा जास्त बाऊ करू नका, घाबरू नका… या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून पुरेशी खबरदारी घेतली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे.
मात्र, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभेत औचित्याच्या मुद्यावर करोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, करोनाबाबत नागरिकांमध्ये जी भिती पसरली आहे ती दूर करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलावीत.
जनजागृती मोहिम हाती घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, करोना हा जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्याच्या जनतेला धीर देण्याचे काम सर्वांनी मिळून करणे आवश्यक आहे.
या संदर्भात गेल्या महिन्याभरापासून आरोग्य विभागाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. करोनाबाबात नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत केली आहे.
त्यासोबतच मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक त्या मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येतात तेथे तपासणीची सोय करण्यात आली आहे.
विमानाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुरेशी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. खासगी रूग्णालयांनाही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. लोकांच्या मनात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात करोनाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये तर काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.