नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचारात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हिंसाचार प्रकरणी २२ एफआयआर नोंदवण्यात आल्या असून २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च सुरू असताना एक ट्रॅक्टर उलटला. यामध्ये नवरीत नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. नवरीत याआधी दोनदा शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. प्रजासत्ताक दिनी तो ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाला. मात्र घरी परतलाच नाही. त्याच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली.
रुद्रपूरजवळ असलेल्या रामपूरच्या डिबडिबा गावात वास्तव्यास असलेला २६ वर्षीय नवरीत आधी ऑस्ट्रेलियात राहायचा. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा स्टडी व्हिसा होता. दोन वर्षांपूर्वी त्यानं ऑस्ट्रेलियात मनशीत कौरसोबत विवाह केला होता. रिसेप्शन देण्यासाठी तो घरी आला होता.
दरम्यान स्टडी व्हिसावर नोकरी केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. नवरीतला भारतात परतून दोन वर्षे झाली होती. तो आणखी वर्षभरानं पुन्हा ऑस्ट्रेलियात जाणार होता. पण मंगळवारी झालेल्या हिंसेत त्याला जीव गमवावा लागला.