इस्लामपूर (प्रतिनिधी) : आपण मंत्री आहोत, मंत्रिपदाची शपथ घेतली आहे,पण ते लोकांमध्ये भडक वक्तव्ये करून हिंसा निर्माण करत आहेत. सर्वसामान्य नागरिकसुद्धा हिंसेचे समर्थन करू शकत नाहीत याचे भान मंत्री जयंत पाटील यांनी ठेवावे असे परखड मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केले.
ते म्हणाले,” शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात जे चालले आहे, त्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे हिंसेचे समर्थन करीत आहेत. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि रयत क्रांती संघटना कामगार आघाडी यांच्यातर्फे आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.
ते म्हणाले, “कोरोनाच्या काळात भीतीमुळे स्वतःला घरात बंदिस्त करून घेतलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता प्रासंगिक बाहेर दिसू लागले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसी यासह राज्यात बरेच महत्त्वाचे प्रश्न आहेत, परंतु मंत्र्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी, कामगार किंवा ज्यांना आवश्यकता आहे, अशांना कोणतीही मदत मिळाली नाही. जोपर्यंत कामगार, शेतकरी, शिक्षक जोवर रस्त्यावर उतरत नाहीत, तोवर सरकारला जाग येणार नाही.”
ते म्हणाले,हिंसेचे समर्थन न करता आंदोलने झाली पाहिजेत. शेतकरी आंदोलनात भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याबाबत स्टोऱ्या तयार करू नयेत, सगळ्या जगाने हे पाहिले आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असलेले लोक मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या या आंदोलनात उतरले आहेत, त्यामुळे प्रचंड हिंसाचार झाला आहे. आपण केलेला हिंसाचार लपविण्यासाठी नवनवीन स्टोऱ्या तयार केल्या जात आहेत, जगाने टीव्हीच्या माध्यमातून हे पाहिले आहे. भाजप सरकारवर आरोप करून लोकांना भडकवले जात आहे. केंद्र सरकारने नऊ वेळा शेतकरी संघटनांशी चर्चा केली. चर्चेतून खूप गोष्टी मान्य झाल्या होत्या.