आंबेगावातील 21 गावांतील राजकारण तापले
रमेश जाधव
रांजणी : आंबेगाव तालुक्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 21 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जाहीर झाला आहेत. तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींवर थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार आहे.
18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल लागणार आहे त्यामुळे तालुक्यात गुलाबी थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार अशी चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहेत. सरपंच उमेदवारांसह सदस्य पदांसाठी उमेदवारांची निवड पूर्ण करून प्रचार मोहिमेसाठी रणनीती आत्तापासूनच आखली जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येते.
तालुक्यात सध्या राजकिय बलाबल पहाता बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असे शिवसेनेचे दोन गट सक्रिय आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अर्थात शिंदे गटाचे नेतृत्व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील करत आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतृत्व जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असलेले ऍड. अविनाश रहाणे, प्रा. राजाराम बाणखेले आणि सुरेश भोर आदी मंडळी करत आहे तर राष्ट्रवादीचे नेतृत्व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील करत आहेत.
सध्या एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारची युती आहे तर उद्धव ठाकरे गट , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस आय पक्ष अशी महाविकासआघाडी तालुक्यात कार्यरत आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पूर्वीच्या युती सरकारचा निर्णय बदलत महाविकासआघाडी सरकारने 2019 साली सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. परंतु काही महिन्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे तेथे दुसऱ्यांदा जनतेतून सरपंच निवड केली जाणार आहे.
तालुक्यात होणाऱ्या 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये आत्तापासूनच चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. दिवाळी संपली तरी शुभेच्छांचा वर्ष सुरूच आहे. शासनाने जाहीर केलेल्या आनंदाचा शिधा काही उमेदवारांकडून मोफत दिला गेला. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक यांचाही कालखंड काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक ही एक प्रकारे राजकीय तालीमच
समजली जाते.
भाऊ, रामराम…
ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला आत्तापासूनच सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर संभाव्य भावी उमेदवारांनी भाऊ, रामराम म्हणण्यास सुरुवात केली आहे. कधी रामराम न देणारे आता आवर्जून राम राम घेत आहेत.
कार्यकर्ते झाले सतर्क
स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच प्रमुख मार्ग आहे, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून कार्यकर्ते देखील आता सतर्क झाले आहेत.
मतदार याद्या घेण्यासाठी गर्दी
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या गावातील भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांच्या याद्या घेण्यासाठी आत्तापासूनच इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसू लागली आहे.