कोपर्डे हवेली – शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गतवर्षीच्या गळीत हंगामात ऊसाला 3100 च्या पुढे दर दिला. परंतु, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांना केवळ 2800-2900 रुपये दरावरच थांबवले. सहकार चळवळ यशवंतराव चव्हाणांनी उभी केली. मात्र, आज त्यांचे चेले त्यांचा विचार विसरले असून ते फक्त सत्तेच्या खुर्चीसाठीच त्यांचे नाव घेत आहेत. त्यामुळे चव्हाण साहेब या कारखानदारांना ऊसाला 3500 रुपये दर देण्याची सुबुद्धी द्या, असे साकडे सदाभाऊ खोत यांनी घातले.
ऊस दारासाठी सोमवार दि. 14 रोजी कोपर्डे हवेली ता. कराड ते कराड येथील प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळापर्यंत पायी यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, कोपर्डेचे प्रगतशील शेतकरी सुदाम चव्हाण, भरत चव्हाण, राजेंद्र चव्हाण यांच्यासह भागातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, दोन कारखान्यांमधील 25 किलोमीटरचे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे ऊस दराबाबत कारखान्यांमधील स्पर्धा वाढली; तरच ऊसाला चांगला भाव मिळेल. सध्या ऊस दराबाबत सर्व पक्षातील कारखानदारांची युती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे ठरवले असून त्यांचा स्वहाकार हाच पक्ष आहे. इतर व्यवसायाला कसलीही बंधने नाहीत. कोणीही, कुठेही कोणताही व्यवसाय सुरु करु शकतो. परंतु, साखर कारखान्यांनाच 25 किलोमीटर अंतराचे बंधन का? असा सवाल करत यापुढे आपल्याला दोन कारखान्यातील अंतराची अट कमी करण्यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती करून मोठा लढा ऊभा करावा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सचिन नलवडे म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्यात सहकार रुजवल्यामुईल सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे सुबत्ता आली. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेऊन साखर कारखानदार राजकारण करत असतात. त्यासाठी आम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी आलो आहोत. त्यांच्याकडे एकच मागणी केली की; ऊस कारखानदारांना 3500 रुपये दर देण्याची सुबध्दी द्या. कोल्हापूर, सांगली येथील कारखानदार ऊस दर जाहीर करतात. पण, सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार दर जाहीर करत नसून ऊसाला 3500 रुपये दर घेण्यासाठी आम्ही आता एकत्रीत आलो आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांनी रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे
शेतकरी सध्या साखर कारखानदारांचा गुलाम झाला आहे. कारखानदार अजून ऊस दर जाहिर करत नाहीत. ऊसाला चांगला दर मिळवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. शिवाय ऊसापासून इतर उपपदार्थ तयार होतात. त्यामुळे साखर कारखानदारांना चांगला दर द्यायला परवडतो. शेतकऱ्यांनी कारखानदारांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी आणि ऊस दरासाठी रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी यावेळी केले.