चंद्रपूर – ७० हजार कोटींचा मलिदा खाणारे आज सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसून पोपटासारखे बोलत असल्याची तिखट टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना केली. ते श्रीमंत देवाजी बाबू खोब्रागडे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ७० हजार कोटी खाल्ल्यानंतर बारामतीचा मीठू आता पोपट झाला आहे. खासदारांची स्थिती गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाही. देवाजी बापू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजाभाऊ खोबरागडे यांच्या काळातही मतभेद होते. मतांतरे होती, पण विचार लोकशाहीचा होता. या सर्वांनी उपेक्षितांसाठी संघर्ष केला. पण आज मनुवादी विचारांचा देश उभा करण्याचे काम सुरू झाले आहे.
मी देव पाहिला नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात मला देव भेटला. मी त्यांच्या पुण्याईनेच इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही पुन्हा चूक केली तर तुम्ही नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी मत द्या यासाठी हे बोलत नाही. तर संविधान व लोकशाही वाचवण्याची ही आपली सामूहिक जबाबदारी आहे यासाठी हे बोलत आहे, असे विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.
कधी-कधी जातही काढावी लागते
कुणाची जात कधी काढू नये. पण कधी-कधी काढावी लागते. सत्ता, संपत्ती काही मर्यादित लोकांच्या हातात गेली आहे. देशातील वातावरण दूषित झाले आहे. जाती-जातीत, धर्मा-धर्मात लढविण्याचे काम सुरू आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मी बाळासाहेब आंबेडकरांना एकत्र येण्याची विनंती करतो. अन्यथा हे लोक बहुजनांचा सर्वात अगोदर बंदोबस्त करतील. या देशात गुजराती, मारवाडी व ३ टक्के लोकसंख्या असलेल्यांचीच सत्ता आहे. तुम्ही-आम्ही काही नाही. ते हो म्हणतील तर हो म्हणा, नाही म्हणतील तर नाही म्हणा, अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी खंतही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलून दाखवली.