Vijay Shivtare Ajit Pawar – २०१९ लोकसभा निवडणुक प्रचार सभेत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना दिलेलं आव्हान ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ‘बघतोच कसा आमदार होतो’ या अजित पवारांच्या खुल्या आव्हानानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जखम आजही विजय शिवतारे यांच्या मनात कायम असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालं आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत सत्ताधारी पक्षात केलेला प्रवेश व त्यानंतर काका-पुतण्यामध्ये उफाळून आलेला राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. विजय शिवतारे यांनी, पवारांमधील याच संघर्षाला पराभवाचे उट्टे काढण्याची संधी मानून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार असा निर्धार त्यांनी केला आहे.
पवार शिवतारे वाद मिटणार? | Vijay Shivtare Ajit Pawar
अशातच आता शिवसेना (शिंदे) गटाचे नेते दीपक केसरकर यांनी, शिवतारे यांच्या बारामती लोकसभा लढण्याच्या निर्धारावर वक्तव्य केलं आहे. ‘बारामतीची जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक अजित पवार यांच्या विचाराचा उमेदवार जिंकेल असा विश्वास आम्हाला आहे. अजित पवार व विजय शिवतारे चर्चेतून यावर तोडगा काढतील.’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामतीमध्ये यंदा तिहेरी लढत? | Vijay Shivtare Ajit Pawar
बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सुप्रिया सुळे या २००९ पासून सलग तीन वेळा बारामती येथून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.
पवार कुटुंबात पडलेल्या राजकीय फुटीमुळे यंदा येथे पवारांची सून विरुद्ध पवारांची लेक अर्थात सुप्रिया सुळे विरोध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच विजय शिवतारे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा केल्याने ही लढत तिहेरी होणार अशी चिन्ह दिसत आहेत.
कोणाला फटका? | Vijay Shivtare Ajit Pawar –
अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष आहे. भाजप, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन प्रमुख पक्ष महायुतीचे घटक आहेत. विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये आहेत. अशातच बारामती लोकसभा निवडणुकांमध्ये विजय शिवतारे उतरले तर याचा फटका महायुतीला बसू शकतो.
भाजपने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील बारामती लोकसभेसाठी पर्यटन केले आहेत. मात्र बारामती जिंकणं भाजपसाठी अद्यापतरी शक्य झालेलं नाही. मात्र अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे बाराम्तीमाधुन पहिल्यांदाच शरद पवार यांना धक्का देण्याची संधी भाजपला चालून आली आहे.
त्यामुळे, महायुतीच्या मतांचे विभाजन होऊ नये, त्याचा फायदा सुळे यांना होऊ शकतो हे ओळखून हा वाद मिटवण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे केसरकर यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.