बाधित शेतकरी निर्णयावर ठाम; विमानतळासाठी जमीन देणार नाही
गावे भकास होण्याचा धोका
भैरवनाथ पाणीपुरवठा योजनेंतर्गत तीन हजार 200 एकर जमिनीला सायफन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु विस्तारवाढ झाल्यास ही योजना पूर्ण बंद होणार आहे. त्यामुळे पाच गावांमधील शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार असून ही गावे भकास होण्याचा धोका आहे.
कराड – कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीने वारंवार आंदोलने, उपोषणे करूनही शासन त्याची दखल घेत नाही. या प्रकल्पात 125 एकर बागायती जमीन बाधित होत असून त्यावर एक हजार 168 कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत. त्यामुळे विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर बाधित शेतकरी ठाम असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
विजयनगर-मुंढे येथे विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे कराड दक्षिणचे जयशंकर यादव, जगन्नाथ ठोकळे, सुनीलदत्त शिंदे, पंजाबराव पाटील, शिवाजीराव शिंदे, गोविंदराव शिंदे, धुमाळ, आनंदराव जमाले, जयसिंग गावडे बाधित शेतकरी उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, येथील सुपीक जमीन हस्तांतरित केल्यास त्यावर अवलंबून असलेली कुटुंबे बेघर होणार आहते. या जमिनीत बागायती पिके, जनावरांना चारा, दूध उत्पादन, भाजीपाला वगैरे उत्पादन घेतले जाते. या प्रकल्पात 593 कुटुंबे पूर्ण उद्ध्वस्त होणार आहेत. विस्तारानंतर या विमानतळावर किती विमाने उतरणार? त्याचा शासनाला किती फायदा होणार? जनतेला किती उपयोग होणार, याची माहिती मिळणे गरजेचे आहे. विमानतळ विस्तारासाठी खटाव तालुक्यातील निढळ गावातील हजारो एकर माळरानाचा विचार करावा. येथील संयुक्त मोजणी झाल्याशिवाय कोणाचे क्षेत्र किती, त्यातील सरकारने किती घेतले, त्याच्या चतु:सीमा, पंचनामे, जबाब असे काहीही न करता बेकायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
या संदर्भात दि. 21 ऑगस्ट रोजी कृती समितीच्या प्रतिनिधींनी प्रकल्पास जमीन देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना सांगितले होते. त्यानंतर प्रकल्पाचे काम स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन 38 दिवसांपासून सुरू असून त्याची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. मतदानाच्या दिवशी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या यादीतील श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते व मुंढे, वारुंजी, केसे, पाडळी, कासारशिरंबे, मनव, ओंड, ओंडोशी येथील प्रकल्पबाधित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. पंजाबराव पाटील, शिवाजीराव शिंदे, गोविंदराव शिंदे, आनंदराव जमाले यांची भाषणे झाली.