जिल्हा पोलीस अधीक्षक; फसवणूक झालेल्यांना संपर्क साधण्याचे आवाहन
सातारा – “कडकनाथ’ कोंबडीपालन प्रकरणी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या महारयत ऍग्रो कंपनीच्या संचालकांच्या विरोधात आर्थिक फसवणूक, विश्वासघात असे गुन्हे दाखल करण्यात येतील. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करून एमपीआयडी ऍक्टखाली कठोर कारवाई करण्यात येईल. फसवणूक करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, अशी ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली.
कडकनाथ कोंबडी पालनातून “एकमेका सहाय्य करू, अवघेची होऊ श्रीमंत’ हे घोषवाक्य घेऊन महारयत ऍग्रो आणि या कंपनीच्या सहा उपकंपन्यांच्या संचालकांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमधील शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्या त्या भागातील पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेतली; परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दाखवल्याने सातारा, कराड, पाटण, खटाव, माण, महाबळेश्वर, जावली आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी गुरुवारी तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. सातपुते यांनी पीडित शेतकऱ्यांशी चर्चा करताना या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची अशी ग्वाही दिली. या प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गुन्हे दाखल करून घेण्याचे आदेशही दिले, अशी माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली. याप्रसंगी कॉ. दिग्विजय पाटील, प्रवीण काटकर, सूर्यकांत चव्हाण, प्रवीण गुजर, सचिन शिर्के, महेश गुरव, रोहित क्षीरसागर, शुभम ढाले, संकेत माने उपस्थित होते.