करोनामुळे खबरदारी; सोशल मीडियावर सुख, दुःखाचे शेअरिंग
सोशल मीडियावर करोनामुळे घेतली जातेय खबरदारी
पिंपरी – करोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. अनेक दिवसांपासून लोक घरातच थांबले आहेत. लॉकडाऊनमुळे अन्य शहरात असलेले आप्तेष्ट व नातेवाईकांसबत संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी व्हिडिओ कॉलचा वापर केला जात आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून अनेक परिवार सोशल मीडियावर एकत्रित येत आपले सुख दुःख शेअर करत आहेत.
करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असले तरी रुग्णांमध्ये वाढच होत आहे. त्यामुळे आता सर्वांवर सक्तीने घरात बसण्याची वेळ आली आहे. करोनाचे परिणाम भोगण्यापेक्षा दोन महिने घरातच थांबलेले बरे अशी अनेकांची मानसिकता आहे. अशा विचित्र परिस्थितीमुळे कोणालाच आपले मित्र व नातेवाईक यांना भेटता येत नाही. फोनवर बोलणे होते. मात्र अत्यंत जवळचे नातेवाईक व मित्र यांच्याशी फक्त फोनवर बोलून समाधान होत नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यात जो आनंद आहे तो फोनवर नसल्याने अनेकांची नाराजी आहे.
जवळच्या मित्राला व नातेवाईकांना समक्ष जरी भेटता येत नसले तरी व्हिडिओ कॉलच्या सहाय्याने त्यांच्याशी थेट संवाद साधता येत असल्याने अनेकजण याचा उपयोग करून घेत आहेत. घरी बसून कोणाची तब्येत कशी आहे. कोण काय करीत आहे. याबरोबरच कोणी परगावी असलेल्या आपल्या आईशी तर कोणी आपल्या मुलामुलांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यामुळे व्हिडिओ कॉल करणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे.
व्हिडिओ कॉल करताना अनेकदा व्यवस्थित आवाज येत नाही किंवा कट होतो. त्यामुळे आता अलिकडे आलेल्या नवनवीन ऍपच्या माध्यमातून एकाचवेळी अनेकांसोबत संवाद साधण्याची चांगली संधी निर्माण होत आहे. घरात बसून पुणे, मुंबई, किंवा गावातील मित्रांसोबतही लाईव्ह संवाद साधता येत आहे. या माध्यमाचा अनेकजण आता वापर करीत आहेत. एरवी केवळ कामानिमित्त व महत्त्वाच्या निरोपासाठी फोनाफोनी होत होती. करोनामुळे घरोघरी प्रत्येकजण निवांत असल्याने सोशल नेटवर्कवर वेळ घालवत आहेत.