नवी दिल्ली – देशातील आयटी हब म्हणून ओळख असलेले बंगळुरू शहर आज पाण्याच्या एका थेंबासाठी कासाविस झाले आहे. माणसाने पैसा खर्च करून मोठ्या इमारती उभारल्या. त्यात अलिशान स्नानगृहे तयार केली. तथापि, तेथील शॉवरमधून पाणीच येणार नसेल तर काय? आज बंगळुरात अशीच स्थिती निर्माण झाली आहे. अवस्था अशी झाली आहे की लोकांना आपल्या कामकाजासाठी ऑफिसला जाणेही अवघड होऊन बसले आहे. (Very serious water crisis in India)
करोनानंतर पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची मागणी जोर धरू लागली आहे. टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते आहे. पाण्याची नासाडी करणाऱ्याला पाच हजार रूपये दंडाची शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. एवढे सगळे आता केले जात असले तरी त्यामुळे पाण्याचे संकट आज भेडसावतेच आहे.
कमी झालेला पाऊस आणि भूजलाची घटलेली पातळी ही बंगळुरूतील जलसंकटाला कारणीभूत आहे. नद्या आणि बोअरवेल असे पाणी पुरवणारे दोन्ही स्त्रोत आटले आहेत. आयटी हबमध्ये हाहाकार माजला आहे. हवामान विभागाने जी भविष्यवाणी केली आहे ती या शहराला दिलासा देण्याऐवजी अधिकच हवालदील करणारी ठरली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तापमानात होत जाणारी वाढ ही असामान्य स्वरूपाची आहे.
देशात वेगळे काय?
बंगळुरूत जे काही चालले आहे ती केवळ एक झलक आहे. देशातील चित्र यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता नाही. किंबहुना कर्नाटकपेक्षा भयावह स्थिती अन्य राज्यांमध्ये निर्माण होऊ शकते अशी भिती वर्तवली जाते आहे. भारत अत्यंत वेगाने पाण्याच्या संकटाकडे वाटचाल करतो आहे, असा दावा अनेक अभ्यास आणि तपासण्यांनंतर करण्यात येतो आहे.
एक एक थेंब पाण्यासाठी तळमळण्याची वेळ लोकांवर येऊ शकते असेही म्हटले जाते आहे. एका दिवसात हे सगळे होणार नाही मात्र सध्या जे काही होते आहे आणि आपण पाहतो आहोत त्यानुसार आपण अगदी वेगाने या दलदलीकडे अग्रेसर होताना दिसतो आहोत.
संपूर्ण जगाच्या लोकसंखेच्या १७ टक्के लोकसंख्या एकट्या भारताची आहे. पाण्याबाबत बोलायचे झाले तर त्याचे प्रमाण केवळ चार टक्के आहे. त्याहून महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण जगाच्या केवळ चार टक्के एवढेच भारतात शुध्द पाण्याचे स्त्रोत आहेत. यावरून आपल्या पुढे किती दारूण स्थिती आहे याची प्रचिती यावी. मागणी अवाढव्य आणि उपलब्धता अत्यंत कमी अशा व्यस्त स्थितीत आपण आलो आहोत.
धक्कादायक अहवाल
नीती आयोगाने अलिकडेच एका अहवालात म्हटले आहे की भारतात केवळ शुध्द आणि स्वच्छ पाण्याच्या कमतरतेमुळे दोन लाख नागरिकांचा मृत्यू होतो आहे. देशातील ७५ टक्के घरे आजही अशी आहेत की जेथे पिण्याचे पाणी येत नाही.
२०३० पर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येला पिण्यासाठी पाणी नसेल. हे आकडेच पाणी आपल्या मुळावर कसे उठणार आहे हे सांगण्यासाठी बोलके आहेत.जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा या केवळ एक ट्रेलर आहेत. जागतिक तापमान जसे वाढेल, हवामान जसे बदलेल तसे पाऊस अधिकच अनियमित होत जाईल.