पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यानुसार, मंत्रिमंडळात ३ महिलांसह २१ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे बिहार मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ३० इतकी झाली आहे. (Bihar CM Nitish Kumar expands Cabinet; 12 BJP and nine JD(U) Ministers sworn in)
नितीश यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूच्या ९ आणि भाजपच्या १२ आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली. त्यांना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्तारामुळे बिहारमधील भाजपच्या मंत्र्यांची संख्या १५, तर जेडीयूच्या मंत्र्यांची संख्या नितीश यांच्यासह १३ इतकी झाली आहे.
जानेवारीच्या अखेरीस नितीश राजद, कॉंग्रेस आणि इतर पक्षांचा समावेश असणाऱ्या महाआघाडीतून बाहेर पडले. त्यांनी पुन्हा भाजपशी मैत्री केली. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएची सत्तावापसी झाली.
पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन झाले त्यावेळी नितीश यांच्यासह ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये जेडीयू आणि भाजपच्या प्रत्येकी ३ आमदारांचा समावेश होता. त्याशिवाय, हमच्या एका आमदाराने आणि एका अपक्षानेही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. विस्तारानंतरही बिहार मंत्रिमंडळातील ६ मंत्रिपदे रिक्त आहेत.