पिंपरी – रस्ते, पदपथ, उड्डाणपुलाखालील किंवा इतर ठिकाणच्या बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने, त्यांचे सांगाडे काही वाहन मालकांनी स्वत:हून काढून घेतली आहेत. तर काही वाहने नोटीस बजावून देखील आहे त्याच ठिकाणी आहेत.
नोटीस देऊनही जी वाहने हटवण्यात आली नाहीत, अशा वाहने तातडीने काढून न घेतल्यास जप्त करण्यात येणार आहेत, असा इशारा महापालिकेचे आयुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी गुरूवारी (दि.27) दिला आहे. केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून, पालिकेने या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे आणि स्टार मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली व इतरत्र पालिकेच्या मालकीच्या जागेवर अनेक ठिकाणी बरीच बेवारस वाहने धुळीने माखलेल्या अवस्थेमध्ये सोडून दिलेली आहेत. काही वाहने अनधिकृतपणे पार्क केलेली आहेत. अशा वाहनांच्या मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयामार्फत अशी वाहने हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अशा वाहनांवर नोटीस देखील चिकटविण्यात आल्या. त्यानंतर बरीचशी वाहने संबंधित वाहन मालकांनी काढून घेतली आहे.
मात्र, नोटीसा देऊन देखील हटविण्यात न आलेल्या वाहनांवर आता कारवाईला सुरुवात केली आहे. नोटीस कालावधी संपुष्टात आल्यानंतर सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण विभागामार्फत कारवाईचे नियोजन केले आहे. बेवारस वाहने हायड्रोलिक क्रेन व ट्रक्सद्वारे जप्त केली जाणार आहेत. अशी वाहने हटवताना त्या वाहनांचे फोटो व चित्रीकरण करण्यात येते. जप्त केलेली वाहने मोशी कचरा डेपोजवळील जागेत ठेवली जात आहेत.