चालक अस्वस्थ : सेवा रस्त्यावर पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहतुकीमुळे अडचणींत भर
पुणे-सोलापूर महामार्ग झाला होता ब्लॉक
टोलनाका कर्मचाऱ्यांकडून कोंडी फोडण्याचा प्रयत्न
वरवंड (वार्ताहर) – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल नाक्यावर आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. लांब रांगांमुळे वाहनचालकांना टोल नाक्यावरून पुढे जाण्यासाठी बराच वेळ थांबावे लागत होते. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास करावा सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत होते.
दौंड तालुक्यातील पाटस या गावातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आज सकाळीपासूनच पाटस गावातील पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. इतकी वाहने असल्याने टोल नाका ओलांडून जाण्यासाठी वाहन चालकांना बराच वेळ थांबावे लागत होते. पुणे – सोलापूर महामार्गावर पाटस गावातील पुलापर्यंत वाहने असल्याने लवकर पुढे जाण्यासाठी वाहन चालकांनी सेवा रस्त्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे सेवा रस्त्यावर चक्का जाम झाला. सेवा रस्त्यावर सोलापूर दिशेने जाणारी वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने उभा असल्याने पलीकडून येणाऱ्या वाहनांना इकडे यायला जागाच उरली नाही. यामुळे तिकडून येणाऱ्या वाहन चालकांना सेवा रस्त्याच्या खालून धोकादायक रीतीने वाहने वाट काढत आणावी लागली. सेवा रस्त्यावर दोन्ही दिशेने ये-जा करणारी वाहने समोरा-समोर येत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस येथील टोलनाक्याच्या अलीकडे जवळचा दौंडकडे जाणारा मार्ग आहे. महामार्गावर वाहने थांबलेली असल्याने दौंड बाजूकडून येणाऱ्या वाहनांना महामार्गावर यायला जागाच उरली नव्हती. यामुळे दौंड बाजूकडून येणारी वाहने दौंड रस्त्यावर अडकली होती; परंतु टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ही बाब लक्षात घेत महामार्गावरील वाहतूक थांबवून, दौंड बाजूने येणाऱ्या वाहनांना रस्ता मोकळा करून दिला.
पाटस येथील टोल नाक्यावर सातत्याने वाहतूककोंडी होत असते. याला टोलनाका व्यवस्थापन आणि एनएचएआयचे अधिकारी जबाबदार आहेत. याबाबत आम्ही निवेदन दिले आहेत, मुळात हा टोलनाकाच चुकीच्या ठिकाणी उभारला आहे. याची चौकशी होऊन हा टोलनाका इतरत्र हलवण्यात यावा, असे निवेदन ही दिले आहे; मात्र एनएचएआय त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
-वसंत साळुंखे, नागरिक पाटस
पाटस टोलनाक्यावर आज सकाळपासून ट्रॅफीक जॅम आहे. रात्रीचेही ट्रॅफिक जॅम होत आहे. आज रविवार असल्याने आणि लग्नाची मोठी तिथी असल्याने नागरिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास झाला आहे. टोलनाका व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्था करून लवकरात लवकर ट्रॅफीक मोकळं केलं पाहिजे.
-संजय शिंदे, ग्रामस्थ पाटस
या टोलनाक्याचा कारभार मनमानी पद्धतीने चालला आहे. पाटस टोलनाक्यावर 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहने थांबल्याने, वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाने महामार्ग नजीकच्या वस्त्यावरील नागरिकांना झोप येत नाही.
-वसंत शितोळे, ग्रामस्थ पाटस
टोल नाक्यावरील सर्व लाइन चालू आहेत. शक्य होईल तितक्या वेगाने वाहने सोडण्यात येत आहेत. दररोजच्या तुलनेत आज वाहनांची संख्या खूप जास्त आहे. अवघ्या तीन तासांत 4700 वाहने टोलनाक्यावरून गेली आहेत. रविवार आणि लग्न तिथी असल्याने वाहनांची संख्या खूप जास्त असल्याने कोंडी
झाली आहे.
-वैभव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी पाटस टोलनाका