बेशिस्त वाहनचालक, लग्नतिथीमुळे वाहनांच्या लागल्या रांगा
वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांच्या नाकीनऊ
आळंदी (वार्ताहर) – लग्नसराई त्यात महत्वाची तिथी असल्याने रविवारी (दि. 1) दिवसभर आळंदी शहरात वाहतूककोंडी झाली. देहू रस्ता, मरकळ रस्ता वडगाव रस्ता परिसरात दर दीड ते दोन तास वाहतूककोंडी कायम होती, त्यामुळे वाहनांच्या सुमारे एक ते दीड किलोमीटर रांगा लागलेल्या होत्या. काही ठिकाणी वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने घातल्याने या वाहतूकनकोंडीत अधिकच भर पडली.
लग्नसराई सुरू असून शहरातील सर्वच मंगल कार्यालये, धर्मशाळा फुल्ल आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळी, वाहने शहरात दिसून येत आहेत.कार्यालयांना, धर्मशाळांना स्वत:ची पार्किंग नसल्याने वाहने थेट रस्त्यावरच पार्क केली जात आहेत. यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.
वाहतूक विभागातील पोलीस दिवसभर चौकात तैनात असतानाही बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांच्या नाकीनऊ आली होती. वाहतूककोंडीमुळे सर्वात मोठा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसत असून बसच्या फेऱ्या उशिराने झाल्याने प्रवाशांना देखील इच्छितस्थळी पोहोचताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. भोसरी, चाकण, चिंबळी, मोशी भागातून मरकळकडे जाणाऱ्या वाहनांना आळंदी शहरातून जाताना मोठी गैरसोय सहन करावी लागली.
“त्यांच्या’ पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सध्या लग्नसईमुळे आळंदी शहरातील मंगल कार्यालये, धर्मशाळा आदी ठिकाणी वऱ्हाडी मंडळांची मोठी गर्दी असते. त्याततच अनेक कार्यालये, धर्मशाळांकडे स्वत:चे पार्किंग नसल्याने हे वऱ्हाडीमंडळी आपली वाहने रस्त्यावरच पण बेशिस्तपणे पार्क करीत असल्याने शहरातील कार्यालयांच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय वाहतूक कोंडीचे आळंदी शहराला लागलेले ग्रहण सुटणार नसल्याचे बोलले जात आहे.
आळंदीतील सर्वच महत्त्वाच्या चौका चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. त्यातच प्रदक्षिणा मार्गावर अनेकांनी बिनधास्तपणे वाहने उभी केल्याने वाहतूककोंडीत वाढ होत आहे. यापुढे अशा बेशिस्त वाहनचालकांना जरब बसवण्यासाठी जॅमर लावुन व खटले भरून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
– शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग