नागपूर – वेदांत समूह आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आला आहे. या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले आहे. यामुळे पूरक छोटे उद्योग आणि लाखोंच्या रोजगाराला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नागपुरात प्रसारमाध्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे हस्तक असायला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेच्या जोमात आहेत.
दिल्लीतील केंद्र सरकारच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस काम करतात. फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईतील आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले, असा आरोप पटोले यांनी केला.
महाराष्ट्रातील पाणी गुजरातला दिले. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी महाराष्ट्राला लुटून देण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते करत आहेत. मुंबई गुजरातला गेली तर आश्चर्य वाटायला नको.
एक लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता. दरवर्षी 26 हजार कोटींचा महसूल राज्य सरकारला मिळाला असता, असेही नाना पटोलेंनी सांगितले.