वडगाव मावळ – वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होता. परंतु, हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रासह मावळातील लाखो युवकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मावळचा विकास खुंटविण्याचे व स्थानिकांच्या तोंडचा घास काढून घेण्याचे काम केले आहे. त्यामुळे मावळातील नागरिक, व्यावसायिक, उद्योजक यांच्याकडून शासनाविरोधात खदखद व्यक्त होत आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले, मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत आहे. केवळ राजकारणासाठी मावळातील तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप करू नका. वेदांत-फोक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय कंपनीने घेतल्यामुळे महाराष्ट्राबरोबरच मावळ तालुक्याचे ही मोठे नुकसान झाले आहे. आंबळे येथे सेमीकंडक्टर्स उत्पादन करणारा हा मोठा प्रकल्प उभा राहणार होता. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच मावळातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार होती. हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यामागे गुजरातधार्जिण्या शिंदे-फडणवीस सरकाचाच हात आहे.
महाविकास आघाडी सरकारने तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न करून महाराष्ट्राच्या व मावळच्या विकासाला गती देणारा हा औद्योगिक प्रकल्प आणला होता. परंतु, सत्ताधारी सरकारमधील नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प मावळच्या भूमीत होणार असल्यामुळे त्याचा लाभ महाराष्ट्रासह मावळातील भूमिपुत्रांना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणार होता. प्रत्यक्ष नोकरी बरोबरच अप्रत्यक्षपणे विविध उद्योग – व्यवसायांना देखील चालना मिळणार होती. त्यातून अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होऊन मावळच्या विकासाला देखील मोठी गती मिळाली असती. तथापि हा प्रकल्प मावळातून जाणे हे केवळ दुर्दैवीच नव्हे तर संतापजनक देखील आहे.
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होता. परंतु, आता हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रासह मावळातील लाखो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप या सरकारने केले आहे.
महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्ये हा प्रकल्प आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धेत होती. परंतु, कंपनीने महाराष्ट्राला पसंती देखील दिली होती. पण अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये कसा काय गेला? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मावळ परिसरातील युवकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आमच्या गावात होणाऱ्या वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीमुळे गावातील तसेच परिसरातील अनेक गावांतील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार होत्या. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने युवकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. ही कंपनी गुजरातला गेल्याने आमच्या संपादित केलेल्या जमिनींचा परतावा देखील लांबणीवर जाणार आहे.
– रवींद्र वायकर, ग्रामस्थ, आंबळे.
जोपर्यंत फोक्सकॉन – वेदांत ही कंपनी पुन्हा मावळात आणणार नाही. तोपर्यंत आम्ही तळेगाव एमआयडीसी पूर्ण बंद करणार आहोत.
– मोहन घोलप, सरपंच, आंबळे
शिंदे-फडणवीस सरकारने मावळचा विकास खुंटविण्याचे व स्थानिकांच्या तोंडचा घास काढून घेण्याचे काम केले आहे. याचा शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो.
– भिकाजी भागवत, सचिव, शेतकरी बचाव कृती समिती.