प्रसिद्ध विनोदी साहित्यिक, वक्ते आणि पत्रकार
वि. आ. बुवा यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 4 जुलै 1926 रोजी पंढरपूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव विनायक आदिनाथ बुवा, पण ते वि. आ. बुवा या नावानेच साहित्यिक क्षेत्रात प्रसिद्ध होते. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर व मिरज येथे झाले. वडिलांच्या अकाली निधनाने त्यांचे पुढील शिक्षण थांबले. मुंबई येथील व्ही. जे. आय. टी. महाविद्यालयात त्यांनी चरितार्थासाठी निवृत्तीपर्यंत वर्ष 1986 पर्यंत नोकरी केली. विनोदबुद्धी. वक्तृत्व आणि सुंदर हस्ताक्षर ही त्यांना जन्मजात मिळालेली ईश्वरी देणगी होती.
याच जोरावर वर्ष 1950 मध्ये “इंदुकला’ हे हस्तलिखित मासिक सुरू केले. या मधे चि. वि. जोशी, शांता शेळके, वसंत बापट यांच्यासारखे दिग्गज लेखकही लेखन करीत असत. हे मासिक अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. त्यांच्या लेखनामध्ये कथा, लघुकादंबरी, ललितलेख, एकांकिका, व्यक्तिचित्रे, लोकनाट्य अशी विविधता होती. त्यांनी अनेक क्षेत्रांत लेखन केले. समाजातील विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे सूक्ष निरीक्षण करून मर्म विनोदी भाषेत आपली कथानके रंगविली. त्यांनी आकाशवाणीसाठी 600 कार्यक्रम दिले तसेच त्यांची ग्रंथ संपदा दीडशेच्या वर पोचली होती.
“अकलेचे तारे’ हा कथासंग्रह असलेले पहिले पुस्तक वर्ष 1953 साली प्रसिद्ध झाले. “अकलेचे दिवे’, “अगा जे घडलेचि आहे’, “अघळ पघळ आणि ऐसपैस’, “अडाण्याचा गाडा’, “अथ बुवा उवाच’ अशी अनेक पुस्तकांची नावे घेता येतील.
“उगीच काहीतरी’, “एकविसावा नग’, “ओष्ठतंत्रम्’, “कशासाठी पैशासाठी’, “खटाटोप’, “खट्याळ काळजात घुसली’ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सामान्य माणुस हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू असल्याने ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकातूनच पुस्तकाचा विनोदी अंतरंग ओळखला जात असे. आकाशवाणीवरील त्यांच्या “पुन्हा प्रपंच’ या लोकप्रिय मालिकेच्या चारशेहून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले होते. विविध मासिकांतून तसेच पुस्तकांतून हजारच्या वर कथा त्यांनी लिहिल्या. त्यावेळचे दिवाळी अंक त्यांच्या लेखनामुळेच गाजत होते. प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला.
तब्बल 60 वर्षे त्यांनी लेखन करून वाचकांना विनोदी पुस्तकांची भेट दिली तसेच आकाशवाणीसारख्या माध्यमातून श्रोत्यांचे रंजनही केले. विनोदी साहित्यात 150 पुस्तकांची निर्मिती हा विक्रम मानला जातो. त्यांनी 1972 मध्ये कल्याणमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविले होते. वर्ष 1983 मध्ये “प्रेमाची एस्सो स्टाइल’ या पुस्तकाला तसेच वर्ष 1997 मध्ये “शंभरावे पुस्तक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट विनोदी साहित्यासाठीचा पुरस्कार देण्यात आला. विनोदी लेखक म्हणून मुंबई मराठी साहित्य संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना वर्ष 1997 मध्ये देण्यात आला. चांगले वक्तृत्व असल्याने त्यांनी व्याख्याने व कथाकथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही दौरे केले होते.
वर्ष 1988 मध्ये त्यांचा धाकटा मुलगा विद्याधर याचे अपघाती तर, 1996 मध्ये त्यांची पत्नी इंदुमती यांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. अखेरच्या दिवसांपर्यंत लेखन करणाऱ्या वि. आ. बुवा यांचे हृदयविकाराने 17 एप्रिल 2011 रोजी कल्याण येथे निधन झाले.