तें ज्ञान पैं गा बरवे । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेसीं ।। जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।। तरी तनुमनुजीवें । चरणांसीं लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ।।
अत्यंत उत्तम असे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे अशी मनापासून इच्छा असेल आणि मनचक्षुला त्याचा अनुभव घेता यावा असे वाटत असेल तर शब्दज्ञानी व साक्षात्कारी संतांची सर्वभावे सेवा करावी. कारण संत म्हणजे साक्षात ज्ञानाचे कोठार आहे. त्यांची सेवा म्हणजे त्या ज्ञानाच्या कोठाराचा उंबरठा आहे.
त्या सेवारूपी उंबरठ्याचा अवलंब करून तो आपल्या स्वाधीन करून घे. हा सेवारूपी उंबरठा स्वाधीन करून घेण्याकरिता शरीराने, मनाने व जीवभावाने त्यांच्या चरणाशी शरण जावे आणि अभिमान सोडून नम्रपणे त्यांची सर्व सेवा करावी. तुम्हाला इच्छीत ज्ञान गुरू किंवा संत यांच्याकडून प्राप्त करण्यासाठी आपला पूर्ण समर्पण भाव हवा.