नवी दिल्ली – कायदेमंडळातील आपल्या प्रतिनिधीला परत बोलाविण्याचा हक्क मतदार संघाला असला पाहिजे असा एक बिनसरकारी ठराव आंध्रचे खासदार टी. बी. विठ्ठलराव यांनी आज लोकसभेत मांडला. विठ्ठलराव म्हणाले, हा ठराव लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्याला दुरुस्ती म्हणून मांडण्यात येत आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलाविण्याचा हक्क मतदारांना असणे ही गोष्ट लोकशाहीला धरून असून ती न्याय्य आहे. इतर देशांत असा हक्क मतदारांना आहे. मात्र हा हक्क देताना तो मतदारांच्या दोन तृतियांश मतांनी मिळावा.
तुरूंगबंदीची मोहीम
मॉस्को – श्वेत रशियातील पिन्स्क शहरात स्थानिक तुरुंगाची आवश्यकता उरली नाही यास्तव तुरूंग बरखास्त करण्यात आला. सर्वसाधारण गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे त्यामुळे येथील इतर तुरूंगही बंद केले आहे.
कैलास-मानस सरोवर भारतीय हद्दीत समाविष्ट करण्याची चीनकडे मागणी करा
अलाहाबाद – तिबेट सार्वभौम असल्याचे तरी जाहीर करा किंवा कैलास-मानस सरोवर आणि पूर्ववाहिनी ब्रह्मपुत्रा नदी तरी भारतीय प्रदेशात समाविष्ट करा अशी चीनकडे भारताने मागणी करावी असे आवाहन समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी केले. माउंट एव्हरेस्टला मूळच्या “सागरमाथा’ या नावानेच संबोधावे.
दादरा-नगरहवेली या मुक्त वसाहती भारतात सामील करून घ्या
नवी दिल्ली – खासदार ना. ग. गोरे यांनी भारत सरकारला एका निवेदनाद्वारे अशी सूचना केली की, सरकारने अनिश्चितपणा टाकून देऊन पोर्तुगीज नियंत्रणातून मुक्त झालेल्या दादरा व नगरहवेली या वसाहती तेथील लोकांच्या इच्छेनुसार भारतात सामील करून घ्याव्यात. दादरा-नगरहवेली त्याचप्रमाणे गोवा, दीव व दमण या वसाहती पोर्तुगालने बेकायदेशीर “लाटल्या’ आहेत.