पुणे : पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश काढण्यात आला होता. मात्र या आदेशाकडे वाहन चालक दुर्लक्ष करत घाटातून प्रवास करत होते. त्यामुळे अखेर रायगड प्रशासनाने वरंधा घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्याची हद्द असणाऱ्या ठिकाणी मुरूम मातीचे ढिगारे लावून रस्ता वाहतुकीसाठी काल रात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे,
२२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान अवजड वाहतुकीकरीता घाट पूर्णपणे बंद राहणार आहे तर हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.
पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात.
त्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून सूचना येईपर्यंत तरी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.