पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडई येथील भाजीपाला, फळ, पान, तरकारी, पूजा साहित्य व भुसारी विक्रेत्यांना पुणे महापालिका व पुणे मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्यांना आपण न्याय मिळवून देणारा असल्याचे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आश्वाशन दिले. त्यांनी आज पुण्यातील महात्मा फुले मंडई येथील व्यावसायिकांची भेट घेतली.
मंडई येथील व्यावसायिकांवर काही दिवसापासून अन्याय होत असल्याने आज प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले मंडई येथे भेट देऊन या व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
आंबेडकर म्हणाले की, मी मेट्रो चा आराखडा पाहिला असून त्यानुसार कार्यवाही करावी, आणि येथील व्यापारी जागा द्यायला तयार आहेत परंतु त्यांचे पहिले पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी आहे. आणि ती बरोबर आहे. मंडई येथील या मध्यमवर्गीय व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. असा विश्वास त्यांनी येथील स्थानिक व्यावसायिकांना दिला.
यावेळी स्थानिक व्यावसायिक यांनी त्यांच्या समस्या आंबेडकर यांना सांगितल्या. यामध्ये आहे त्या जागी पुनर्वसन करावे, भाडेवाढ रद्द करावी, गाळे दुरुस्ती करावी, रोज स्वछता व साफसफाई करावी, करारनामा रद्द करावा यासारख्या मागण्या त्यांनी आंबेडकर यांना सांगितल्या.
यावेळी मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची, वंचित आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले, शहराध्यक्ष मूनवर कुरेशी, नितीन शेलार, भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुरड्डे, राहुल खोपडे, संतोष कुदळे, कमलेश काची, राजू शहाणे, महेश जाधव तसेच मंडई येथील सर्व व्यावसायिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.