मुंबई – भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रीरामाचा ईव्हीएम सारखा वापर होत असल्याची तिखट टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांनी भाजपवर अनेक महापुरुष व त्यांचा वारसा चोरण्याचाही आरोप केला आहे.
आंबेडकर यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. पण त्यांनी भाजपकडून या सोहळ्याचा वापर राजकारणासाठी होत असल्याचा आरोप करत अयोध्येला जाण्यास नकार दिला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवत त्यांच्यावर देवाचा वापर ईव्हीएमसारखा करण्याचा आरोप केला आहे.
आंबेडकर गुरुवारी एका ट्विटद्वारे म्हणाले की, मागील १० वर्षांत भाजप व संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, रविंद्रनाथ टागोर व भगतसिंग यांच्यासारखे अनेक भारतीय महापुरुष व त्यांचा वारसा बळकावण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांच्याकडे असा कोणताही महापुरुष नाही.
आता भाजप व आरएसएस कोणतीही नैतिकता व सिद्धांताशिवाय स्वतःच्या निवडणूक फायद्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनाचा वापर करून देवाला बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत भाजप व संघाकडून देवाचा वापर ईव्हीएमसारखा केला जात आहे, असे आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तत्पूर्वी, बुधवारीही प्रकाश आंबेडकर यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण फेटाळले होते. तसेच भाजप व संघावर अयोध्येतील संपूर्ण सोहळा बळकावल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेचे निमंत्रण दिल्याबद्दल आभार. पण मी या कथित सोहळ्याला येऊ शकत नाही. कारण, हा संपूर्ण सोहळा भाजप व आरएसएसने बळकावला आहे. हा धार्मिक सोहळा एका राजकीय पक्षाची निवडणुकीत लाभ मिळवण्याची मोहीम बनला आहे.
बाबासाहेबांनी दिला होता इशारा
माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याविषयी एक इशारा दिला होता की, राजकीय पक्षांनी धर्म व पंथाला देशाहून जास्त प्राधान्य दिले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा संकटात सापडेल. कदाचित असे झाले तर आपण पुन्हा हे स्वातंत्र्य गमावून बसू. आज ही भीती खरी होताना दिसून येत आहे. धर्म व पंथाला देशाहून मोठ्या मानणाऱ्या भाजप व संघाने राम मंदिराचा संपूर्ण सोहळा बळकावला आहे, असेही आंबेडकर म्हणाले.