-प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवेशद्वार बंद ”
-तातडीच्या कामांसाठीच प्रवेश
सातारा – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सातारा पालिकेने अनेक पावले उचलली आहेत. बावीस विभागांचे निर्जंतुकीकरण आणि पालिकेत येणाऱ्या प्रत्येकाला हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामांसाठीच पालिकेत नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.
नागरी सुविधा केंद्रात “एक नागरिक एक बिल’ धोरण सक्तीने राबवले जात आहे. सातारा शहरात करोनाच्या संसर्गापेक्षा भीतीने नागरिक गर्भगळीत झाले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे नगरपालिका प्रचंड सतर्क झाली आहे. पालिकेत सॅनिटायझरचा वापर व मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
पालिकेच्या 25 आस्थापनांमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क व सुती रूमाल वापरणे अपरिहार्य करण्यात आले आहे. पालिकेचे उत्तराभिमुखी प्रवेशद्वार आज सकाळी 11 वाजता बंद करण्यात आले होते. जुन्या प्रवेशद्वाराच्या एकाच शटरमधून नागरिक व कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता.
नागरिकांनी अतितातडीच्या कामासाठी पालिकेत प्रवेश करताना आधी नाव, मोबाइल नंबर व कामाचे स्वरूप नोंदवायचे आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनच प्रवेश करायचा, हे सक्तीचे करण्यात आली आहे.
सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप
पालिकेच्या आरोग्य विभागातील शंभर कर्मचाऱ्यांनी इमारतीची स्वच्छता केली. पालिकेच्या सर्व दालनांमध्ये आज औषध फवारणी व दरवाजांच्या लॉकची स्वच्छता करण्यात आली. 465 कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य समितीच्या सभापती अनिता घोरपडे व उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या सूचनेप्रमाणे सॅनिटायझर व मास्क वाटण्यात आले. पिचकाऱ्यांनी लाल झालेल्या पालिकेच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या. आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, यादव, टोपे व सफाई कामगारांनी प्रत्येक विभागाला भेट देऊन शास्त्रीय पद्धतीने हात धुण्याबाबत माहिती दिली.
घंटागाड्यांवर करोनाची धून वाजत नाही
जिथे वारंवार कचरा होतो, अशा चौकांच्या स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदारांना देण्यात आली आहे. ही जबाबदारी त्यांनी 31 मार्चपर्यंत पार पाडायची आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याबाबतची घोषणा करणारी धून घंटागाड्यांना बसवेल्या ध्वनिक्षेपकांवरून वाजवणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, घंटागाड्यांवर धून वाजत नसल्याच्या तक्रारी आहेत. बांधकाम समितीच्या सभापतींच्या वॉर्डात घंटागाडी येत नसल्याची तक्रार आहे. अंजली कॉलनी व अर्कशाळानगर या त्रिशंकू परिसरात घंटागाड्या जात नसल्याने कचऱ्याचे ढीग झाले आहेत.