लखनौ – देशावर सध्या घोंघावत असलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन अत्यावश्यक असला तरी यामुळं परप्रांतीय मजुरांचे हाल होताना दिसत आहेत.
अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील मजुरांसाठी धावून आले असून त्यांनी महाराष्ट्र, उत्तराखंड व हरयाणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे रोजंदारीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठी अन्न व निवासाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
याबाबतची माहिती एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली असून, ‘तुमच्या राज्यात वास्तव्यास असलेल्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना अन्न व निवासाची सोय उपलब्ध करून द्यावी. याचा खर्च उत्तर प्रदेश सरकारतर्फे देण्यात येईल.’ अशी मागणी योगींनी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशातून येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असून सध्या लॉक डाऊन असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच लॉक डाऊन असल्याने या मजुरांना आपल्या राज्यामध्ये परतणे देखील अशक्य झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र, उत्तराखंड व हरयाणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली असून त्यांच्या मागणीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.