नवी दिल्ली : भारतात करोनाच्या लाटेचा थैमान झाला आहे. करोनामुळे देशातील मृतांच्या आकडेवारीने आता आणखी एक नकोसा विक्रम केला आहे. कारण आज देशात मृतांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. यातही दुर्दैवाची बाब म्हणजे करोनामुळे आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेल्या देशांच्या यादीतही भारताचा समावेश झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 2 लाख 22 हजार 315 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 4 हजार 454 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 02 हजार 544 जण करोनातून मुक्त झाले आहेत. याआधी शनिवारी देशात 2 लाख 40 हजार नव्या करोनाबाधितांची नोंद झाली होती तर 3 हजार 741 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.
जगभरात करोनामुळे आतापर्यंत सुमारे 35 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन लाख भारतीयांचा समावेश आहे. या हिशेबाने जगात करोनाने मृत्युमुखी पडणारा प्रत्येक तेरावा व्यक्ती भारतीय होता. ब्राझील आणि अमेरिकेनंतर करोनामुळे सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. अमेरिकेते आतापर्यंत सुमारे सहा लाख आणि ब्राझीलमध्ये साडेचार लाख जणांना करोनामुळे बळी गेला. भारतात जगभरातील सुमारे 17 टक्के लोकसंख्या आहे.
देशात करोनामुळे होणारा मृत्यूदर 1.13 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 88 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सक्रिय रुग्णांची संख्या घटून 11 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. करोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे.