हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. बुधवारी एकाच दिवशी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. सुशील सुरेश शिरा (वय 26, रा. हाताळा ता. सेनगाव) आणि व्यंकटी गंगाधर भोसले (वय 41, रा. वसमत) असं आत्महत्या करुन जीवन संपविलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
पहिल्या घटनेत, जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे एका 26 वर्षीय तरुणाने शेतातील आखाड्यामध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 15 मार्च रोजी दुपारी दीड ते अडीच वाजेदरम्यान घडली. सदर प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुशील सुरेश शिरा असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तरुणाने हाताळा शेतशिवारातील गट नंबर 285 शेतातील आखाड्यांमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिस पाटील प्रल्हाद किसन काळे यांनी दिलेल्या खबरीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नायक राहुल मैंदकर करीत आहेत.
बँक कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
दुसऱ्या घटनेत, वसमत कवठा मार्गावरील शेतात 41 वर्षीय शेतकऱ्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे? या चिंतेने झाडाच्या फांदीला रुमाल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
देशाचे भविष्य कृषी क्षेत्रात; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत – राज्यपाल बैस
वसमत शहरातील अल्पभूधारक मयत शेतकरी व्यंकटी गंगाधर भोसले (वय ४१, रा. वसमत) यांच्यावर युनियन बँकचे 2 लाख व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे 50 हजार रुपये कर्ज होते. शेतातील नापिकीने कर्ज कसे फेडावे? याची चिंता त्यांना सतावत होती. त्यांनी 15 मार्च रोजी रात्री 9.30 वा. दरम्यान त्यांच्या शेतातील झाडाच्या फांदीस रुमाल बांधून गळफास घेतला. मयत शेतकऱ्यांच्या पश्यात आई ,पत्नी ,दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.