UPSC Result – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी नागरी सेवा परीक्षा- 2023 चा निकाल जाहीर केला. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) साठी 1016 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यापैकी 180 IAS आणि 200 IPS अधिकारी होतील. ही परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर 4 जानेवारी ते 9 एप्रिलपर्यंत मुलाखती झाल्या. आज त्याचे निकाल जाहीर झाले. एकूण 1016 निवडलेल्या उमेदवारांपैकी 664 पुरुष आणि 352 महिला आहेत. (Anket Jadhav of Hingoli secured 395th rank without tuition and cleared UPSC in first attempt)
हिंगोलीच्या अंकेत यांचे पहिल्याच प्रयत्नात यश –
या परीक्षेत कळमनुरी तालुक्यातील शिवणी या ग्रामीण भागातील डॉ. अंकेत जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय तसेच रुग्णांची सेवा करीत हे यश मिळविले आहे. अंकेत यांचा जन्म कळमनुरी तालुक्यातील शिवणी या खेडेगावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. पाचवी पासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळमनुरीच्या महात्मा फुले विद्यालयात झाले. अंकेतचे आई, वडिल शेती करतात. मात्र एकुलता एक मुलगा हुशार असल्याने त्यांनी अधिकारी व्हावे असे स्वप्न त्याच्या आई, वडिलांनी पाहिले. पोटाला चिमटा घेऊन त्यांनी डॉ. अंकेत यांना शिक्षण दिले.
त्यानंतर अंकेत यांनी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात 12 वीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर पुणे येथे 2022 मध्ये एम. बी. बी. एस.चे शिक्षण पूर्ण केले. मागील काही दिवसांपासून ते वाकोडी (ता. कळमनुरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. वैद्यकिय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
रुग्णांची सेवा करीत त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला. ऑनलाईन अभ्यास करून त्याने मे 2023 मध्ये झालेली पूर्व परिक्षा उत्तीर्ण केली. आता यश टप्प्यात आले हे लक्षात घेऊन त्यांनी दिवस रात्र एक करुन मुख्य परिक्षेचा अभ्यास केला अन् सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या मुख्य परिक्षेत यश मिळविले. मुलाखतीची तयारी करून त्यांनी जानेवारी 2024 मध्ये मुलाखत दिली होती. आज या परिक्षेचा निकाल जाहिर झाला आणि 395 वी रँक मिळाली. कुठल्याही शिकवणी शिवाय हे यश हिंगोली जिल्हा वासीयांची मान उंचावणारे ठरले आहे.
“तरुणांनी यशाला मिळविणे कठीण नाही. कुठल्याही परिक्षेसाठी आधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक असून त्यासोबतच अभ्यासात सातत्य व कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे.” – डॉ. अंकेत जाधव